सोलापूर - भाजपच्या विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआय चौकशीला बोलावले जाते. (Nana Patole In Soalapur) त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. मग, फोन टॅपिंग प्रकरणातील जबाबासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावले तर त्यामध्ये घाबरण्याचे काय काणर? तसेच, त्या गोष्टीचे राजकारण करण्याची काय गरज? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Nana Patole strongly criticizes BJP) ते सोलापूर दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते.
ओबीसींचा मेळावा
रश्मी शुक्ला त्याठिकाणी काम करीत असताना त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते. त्यांना कोणी परवानगी दिली, याची चौकशी होणार आहे. मुळात भाजपला लोकशाही, संविधान मान्य नसल्याने ते आपल्यावर काहीतरी आले की गोंधळ निर्माण करीत असल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे. पटोले हे सोलापुरातील ओबीसींचा मेळावा आणि सोलापूर शहर कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने रविवारी (दि. 13 मार्च)रोजी ते येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले होते.
पहाटेच्या शपथविधीनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता-
पटोले यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले, पहाटे शपथविधी होऊन नवे सरकार स्थापन झाले, पण ते सरकार पडल्यानंतर सर्वच पक्षांची आवस्था काय झाली होती. त्यावेळी आमच्या पक्षश्रेष्ठींनी ठरवले असते तर निश्चितपणे कॉंग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. पण, सोनिया गांधी यांनी सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी जाहीर करावी लागली.