महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 27, 2019, 10:35 PM IST

ETV Bharat / state

'गाव तेथे वऱ्हाड'; येथे वॉटर कप स्पर्धेच्या शिवारातच पार पडला लग्न सोहळा

हा विवाह सोहळा शनिवार दुपारी एक वाजता जामगाव येथे पार पडला. माढा तालुक्याच्या पूर्व भागातील जामगाव हे सातत्याने दुष्काळाशी झुंजणारे गाव आहे.

वॉटर कप स्पर्धेच्या शिवारातच पार पडला लग्न सोहळा

सोलापूर- दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी राज्यात ग्रामीण जनतेला बळ देणाऱ्या पाणी फाउंडेशनची चळवळ आता लोकचळवळ झाली आहे. आज माढा तालुक्यातील एक युवा शेतकरी कुमार चव्हाण याने थेट 'गाव तेथे वऱ्हाड' म्हणत आपला विवाह पाणी फाऊंडेशनचे काम सुरू असलेल्या गावी केला.

वॉटर कप स्पर्धेच्या शिवारातच पार पडला लग्न सोहळा

यानिमित्ताने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावकऱ्यांच्या लढ्यात आपणही सहभागी असल्याचा संदेशच कुमारने घालून दिला. याविवाहवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर, प्रमोद पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष पाटील, केवडचे माजी सरपंच सुहास पाटील, विठ्ठल भुईटे यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक राजकुमार माने, ज्योती सुर्वे, सुशांत गायकवाड, सुप्रिया जंगले, अंकिता पवार, चेतन जाधव, प्रतिमा सुर्यवंशी, वसिम शेख उपस्थित होते.

हा विवाह सोहळा शनिवार दुपारी एक वाजता जामगाव येथे पार पडला. माढा तालुक्याच्या पूर्व भागातील जामगाव हे सातत्याने दुष्काळाशी झुंजणारे गाव आहे. या गावातील तरुणांनी एकत्र येत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. या कामानिमित्ताने लोक एकमेकांच्या सुख-दुःखाशी समरस झाले. त्याचवेळी गावातल्या कुमार चव्हाणने सर्व गावकऱ्यांना एक सुखद धक्का दिला. कोणताही गाजा वाजा न करता आणि विना हुंडा हा विवाह केला आहे.

बारावीपर्यंत शिक्षण झालेला कुमार हा आपल्या आई वडिलांसह जामगाव येथेच शेती करतो. त्याने गतवर्षी पाणी फाऊंडेशनमार्फत लोधवडे (ता. माण, जि. सातारा) येथे जलसंधारणाच्या कामाचे ट्रेनिंगही घेतले होते. त्यानंतर यावर्षी जामगाव हे गाव पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. याठिकाणी दररोज कुमार हा गावक-यांसह श्रमदान करतो. हे काम चालू असतानाच कुमार याचा विवाह मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील वधू अमृता भाऊराव देशमुख हिच्याशी ठरला. या दोघांनी आपल्या नवजीवनाची सुरुवात पाणी फाऊंडेशनच्या कामावरच करण्याचे ठरवले. त्यानुसार आज हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी मंडप मारून हा विवाह करण्यात आला. त्यानंतर आलेल्या वऱ्हाडी मंडळीनीही श्रमदान केले. अत्यंत साध्यापद्धतीने विना हुंडा हा विवाह सोहळा पार पडला.

लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि सामान्य माणसे आता आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा रमली आहेत. जामगावात पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नांशी दोन हात करण्यासाठी सारसावलेली माणसे आता पुन्हा जलसंधारणाच्या कामाला लागली आहेत. अशातच ध्येयवेड्या कुमार आणि अमृता या जोडीने दुष्काळाशी दोन हात करण्याबरोबरच हुंडा न घेता केलेला विवाह निश्चितच कौतुकास्पद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details