महाराष्ट्र

maharashtra

मराठा आरक्षण प्रकरण: मराठा समाजाचा मुंबई, पंढरपुरात आक्रोश मोर्चा

By

Published : Nov 7, 2020, 7:26 PM IST

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय या आक्रोश मोर्चाला आज पंढरपुरातून सुरुवात झाली. प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली असतानाही तो आदेश झुगारून आज नामदेव पायरीवर नतमस्तक होत मोजक्याच मराठा कार्यकर्त्यांनी मोर्चाला सुरुवात केली. मुंबईमध्येही आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वांद्रे ते मातोश्रीपर्यंत मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Maratha Agitation
मराठा आंदोलन

मुंबई / पंढरपूर- सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वांद्र्यातील जिल्ह्याधिकारी कार्यालयात मशाल मोर्चा काढण्यात आला. विनायक मेटे यांच्यासह मराठा नेते यात सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठी बांधव या मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, पंढरपुरात आज सकाळी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना शहराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. केवळ ८ ते १० कार्यकर्त्यांना मुंबईच्या दिशेने जाऊ देण्यात आले. त्यांच्यासोबत पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पुण्यात हा मोर्चा अडवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजामधील हा रोष विविध आंदोलन आणि बैठकांमधून व्यक्त होत आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय, यासारख्या राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे मराठा समाजाच्या असंतोषात भर पडली आहे. आरक्षणाला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारने जबाबदारीने आणि अत्यंत तातडीने पावले उचलून मराठा विद्यार्थ्यांचे, तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेच स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी अर्ज करणे, प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या सर्व आघाड्यांवर हे आघाडी सरकार अपयशी ठरले. मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती योग्य तो निर्णय घेण्यात अपयशीच ठरली नाही, तर स्वतः अशोक चव्हाणही गोंधळात असल्याचा आरोप आंदोलक करत आहे.

मुंबईत मशाल मोर्चा -

या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठा मशाल मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला हा मोर्चा वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून मातोश्रीवर धडकणार होता. पण मातोश्रीवर जाण्याची परवानगी न मिळाल्याने वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावरच हा मोर्चा काढण्यात आला. या मशाल मोर्चात अनेक मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना विनायक मेटे म्हणाले, की पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करण्यात येत आहे. स्वर्गिय बाळासाहेबांनी घालून दिलेली परंपरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राखायला हवी. मराठा समाजाला आरक्षण देऊन लोककल्याणाचे काम करायला हवे. प्रस्थापित मराठा नेत्यांमुळे मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मराठा समाजाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे.

पंढरपुरातून निघालेला मोर्चा पुण्यात अडवला -

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय या आक्रोश मोर्चाला आज सकाळी पंढरपुरातून सुरुवात झाली. प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली असतानाही तो आदेश झुगारून आज नामदेव पायरीवर नतमस्तक होत मोजक्याच मराठा कार्यकर्त्यांनी मोर्चाला सुरुवात केली. यावेळी राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याची आणि अन्य मागण्या मान्य करण्याची सरकारला 'सद्बुद्धी दे' असे साकडे विठ्ठला चरणी घालण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला हा मोर्चा विठ्ठल मंदिरापुढील नामदेव पायरीपासून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायीच मार्गस्थ झाला. त्यानंतर दहा गाड्यांमध्ये मराठा बांधव बसून मुंबईकडे रवाना झाले. त्याठिकाणी मुख्य सचिवांसह मराठा बांधवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.

कोरोना संपल्यावर सरकारला शांत बसू देणार नाही -

आम्ही 'मराठा जोडो' आंदोलनाच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत, परंतु सरकारकडून आमची सर्व आंदोलने दडपली जात आहेत, त्यामुळे सरकारने आमचा अंत पाहू नये, सरकारची अशीच भूमिका राहिली तर, कोरोना आणि त्याचा प्रभाव कमी झाल्यास सरकारला आम्ही शांत बसू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी सरकारला हा गंभीर इशारा दिला.

सरकारने अंत पाहू नये -

आमची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, सरकारने आमचा अंत पाहू नये. अनेक विद्यार्थ्याचे प्रवेश थांबले आहेत, त्यावर तातडीने मार्ग काढावा. अन्यथा, आम्ही सरकार विरोधात रान पेटवू असाही त्यांनी इशारा दिला. अभिजित पाटील म्हणाले, की सरकारकडून मराठा समाजाला वेगळ्या जागा राखून ठेवून नोकर भरती केले जाण्याविषयी बोलताना, तशी कायद्यात तरतूद नाही. यामुळे आम्ही ही भरती होऊ देणार नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत सावंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details