सोलापूर- ईव्हीएम विरोधात संपूर्ण राज्यभरात भारिप बहुजन महासंघाकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. भारिपने पुकारलेल्या घंटानाद आंदोलनामध्ये वंचित आघाडीतील सर्व घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
भारिप बहुजन महासंघाकडून ईव्हीएम विरोधात 17 जून रोजी राज्यभरात घंटानाद आंदोलन; वंचितचा पाठिंबा
ईव्हीएम विरोधात संपूर्ण राज्यभरात भारिप बहुजन महासंघाकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
आज पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी भारिपच्या आंदोलनास पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 'ईव्हीएम हटाव, देश बचाव' असा नारा देत ईव्हीएम विरोधात संपूर्ण राज्यात १७ जून रोजी घंटानाद आंदोलन होणार आहे. यावेळी गोपिचंद पडळकर यांनी ईव्हीएम मशीन बद्दल शंका उपस्थित केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानामधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारीही केल्या आहेत. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मत मोजणीच्या वेळी दिलेली आकडेवारी यामध्ये तफावत असून याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक आयोगा विरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. तसेच पुढील काळातील होणाऱया निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली असल्याचेही पडळकर यांनी संगितले.