सोलापूर- येथील शेळगी पुलावर रात्री रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. बाजार समितीत आपला भाजीपाला विकण्यास जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची दुचाकी वाहने रस्त्याचा अंदाज न आल्याने घसरली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. महादेव बाळासाहेब कदम (वय 34 वर्षे, रा. गूळवंची, ता. उत्तर सोलापूर), असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर 15 शेतकरी जखमी झाले आहेत. महामार्गाचे काम पाहणारे अधिकारी व ठेकेदार यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पंधरा शेतकरी जखमी आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू
गूळवंची, हिप्परगा, उळे आदी गावातील शेतकरी दररोज शेळगी येथील महामार्गवरून सोलापूर बाजार समितीत भाजी व शेतमाल विक्रीसाठी जातात. पण, शनिवारी (दि. 12 जून) दिवसभरात शेळगी पुलावर मशीनच्या साहायाने महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले होते. ही बाब शेतकऱ्यांना माहित नव्हती. रोजच्या प्रमाणे रविवारी (दि. 13 जून) पहाटे शेतकरी हे दुचाकीवरून मार्केट यार्डकडे दुचाकीवर जात होते. रविवारी पहाटे सुमारे 15 शेतकरी याठिकाणी दुचाकीवरून घसरून जखमी झाले आहेत. तर महादेव कदम हे दुचाकीवरून खाली पडले. त्यावेळी मागून आलेल्या जड वाहनाने धडक दिली. याचा महादेवचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी महादेव याला उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.