सोलापूर - माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज दुपारी काँग्रेस भवनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्यात गेल्या वर्षी अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस दिले होते. मात्र, गेल्या वर्षीपासून आजतागायत एफआरपीची रक्कम मिळाली नाही अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा महाविकास आघाडी सरकारने राज्यभर निषेध नोंदविला. पण महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्यासाठी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आस्था दाखवली पाहिजे अशी मागणी करत बुधवारी दुपारी सिद्धाराम म्हेत्रे यांना आंदोलकांनी लक्ष केले. दिवसभर काँग्रेस भवनासमोर शेतकरी बसल्याने काँग्रेसचे स्थानिक नेते काँग्रेस भवन येथे फिरकलेही नाहीत.
मातोश्री साखर कारखान्यावर कारवाई करावी
शेतकऱ्यांना उसाची बिलं गाळप झाल्यानंतर साखर कारखान्याने पंधरा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. तसा कायदा देखील आहे. पण हा कायदा पायदळी तुडवत वर्ष लोटले तरीही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. जिल्हाधिकारी यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या साखर कारखान्यावर कडक कारवाई करत 2021-2022 ला ऊस गाळपाचा परवाना न देता आर. आर. सी.( rrc )काढून कारखाना जप्त करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.