महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सबसिडीसह नाबार्डचे लोन मिळवून देण्याचे आश्वासन; मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांची फसवणूक - मंगळवेढा शेतकरी फसवणूक न्यूज

नाबार्डचे लोन मिळवून देण्याच्या नावाखाली मंगळवेढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. फसवणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई व्हावी, यासाठी शेतकरी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

Hunger Strike
उपोषण

By

Published : Jan 24, 2021, 7:15 AM IST

सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील पाच गावातील शेतकऱ्यांना नाबार्डचे लोन मिळवून देतो, अशी थाप मारून एका कंपनीने फसवणूक केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मंगळवेढा येथील भाळवणी, डोंगरगाव, तळसंगी, हजापूर, जुणोनी या गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली

दुग्ध व्यवसायापासून फसवणूक सुरू -

लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीने ही फसवणूक केला असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांना पाच-पाच जणांचे गट स्थापन करण्यास सांगितले. दुग्ध व्यवसायसाठी विदर्भ कोकण बँकेकडे अर्ज करण्यास सांगितले. बँकेने गायी घेण्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये व दुसऱ्या हप्त्यात 3 लाख 50 हजार असे एकूण 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. परंतु शेतकऱ्यांच्या हाती फक्त 3 लाख 23 हजार रुपये आले.

शेतकऱ्यांकडून कमी दाराने दूध घेतले -

लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांकडून दूध घेण्यास सुरुवात केली. हे दुध इतर कंपन्यापेक्षा 4 ते 5 रुपये प्रती लिटर कमी दराने घेतले. शेतकरी हे सबसिडी मिळेल या आशेने कंपनीविरोधात गप्पच होते. या कंपनीने गावोगावी दूध डेअरी स्थापन करून शेतकऱ्यांकडून अल्प दरात दूध घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या नावे कंपनीने दुसरा हप्ता उचलला -

मंगळवेढा येथील शेतकरी दुसरा साडेतीन लाखांचा हप्ता कधी मिळणार याची चौकशी लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीकडे करू लागले. पण, कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून उत्तर देण्यास टाळाटाळ होत होती. शेवटी शेतकऱ्यांनी विदर्भ कोकण बँकेकडे जाऊन चौकशी केली असता, सदर कंपनीने दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या नावाने उचलला असल्याची माहिती समोर आली.

कंपनीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि धमकी -

लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावे गोळी पेंड, सुग्रास, मका, भरडा यांची बोगस बिले काढली आहेत. तसेच ज्या गायी मृत झाल्या आहेत, त्याचा विमा देखील या कंपनीने परस्पर हडप केला आहे. सदर कंपनी विरोधात शेतकरी तक्रार करू लागल्यावर त्यांवर दबाव टाकला जात आहे. शेतकऱ्यांचे तारण म्हणून घेतलेली चेक बाऊन्स करण्याची धमकी देणे, त्यांच्या गायी ओढून घेऊन जाणे, असे प्रकार सुरू आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून सदर कंपनी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत शेतकरी आहेत. त्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details