महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाची दडी; ऐंशी वर्षांचा बळीराजावर दुबार पेरणीचं संकट, पत्नीसह पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या दरम्यान, एका वयोवृद्ध जोडप्याचा दुबार पेरणी करतानाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

By

Published : Jul 6, 2020, 2:19 AM IST

crisis of double sowing on farmers in solapur district
पावसाची दडी; ऐंशी वर्षांचा बळीराजावर दुबार पेरणीचं संकट, पत्नीसह पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

सोलापूर - यंदाच्या वर्षी नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची सुरुवात दमदार झाली आहे. हंगामातील पहिला महिना असलेल्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आनंदी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी जूनच्या सुरूवातीला खरिपांच्या पिकांची पेरणी केली. सध्या पिके अंकुरली असून, काही भागांत अधूनमधून पडणाऱ्या हलक्‍या पावसाने ही पिके तग धरून आहेत. तर काही भागाच्या कोरडवाहू जमिनीतील पिकांची अवस्था बिकट आहे. त्यात जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या दरम्यान, एका वयोवृद्ध जोडप्याचा, दुबार पेरणी करतानाचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील धामणगावचे नरहरी ढेकणे आणि सोजर ढेकणे या वयोवृद्ध जोडप्याचा हा व्हिडिओ आहे. नरहरी यांचे वय 80 च्या घरात तर सोजरकाकू या 70 च्या आहेत. ढेकणे दाम्पत्यांना मुलबाळ नाहीत. ते शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ना गाडी आहे ना बैलजोडी. त्यांनी सुरूवातीचा पाऊस झाल्यानंतर, कसेबसे पैसे जमवून खरिपांच्या पिकाची पेरणी केली. पण पावसाने दडी मारली आणि त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. तेव्हा ढेकणे दाम्पत्याकडे दुबार पेरणीसाठी पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी स्वत:च तिफण जुपून पेरणी केली. नेमका हा क्षण संवेदनशील माणसाने त्यांच्या मोबाईलमध्ये टिपला. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नरहरी ढेकणे पत्नी सोजर यांच्यासह पेरणी करताना...

ढेकणे दाम्पत्याला गावात रहायला पक्के घर नसल्याने, ते आजही पत्र्याच्या शेडमध्येच राहतात. आपल्या शेतात जेवढं पिकतंय तेवढ्यावरचं ते आपल्या संसाराचा गाडा हाकतात. सद्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग थांबले आहे. पण जगाचा पोशिंदा म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्याने या काळातही आपल्या शेतीवरची निष्ठा तसूभरही ढळू दिलेली नाही. हे ढेकणे दाम्पत्याच्या शेतीवरील निष्ठेने दिसून येते.

हेही वाचा -पंढरीत व्यावसायिकांनी काढून फेकले चीनी वस्तूंच्या जाहिरातीचे फलक; झळकले मेड इन इंडियाचे फलक

हेही वाचा -सोलापुरातील तूरडाळ चोरांना अटक; 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details