महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अक्कलकोट तालुक्यात भाजपमध्ये वाद उफाळला; आरोप प्रत्यारोपामुळे राजकारण तापले

विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी विरोधी पक्षातील लोकांबद्दल किंवा विकासाबद्दल बोलण्याऐवजी भाजपच्याच नेत्यांवर तोंडसुख घेतले.

By

Published : Jul 29, 2019, 9:10 PM IST

अक्कलकोट तालुक्यात भाजपमध्ये वाद उफाळला

सोलापूर- अक्कलकोट तालुक्यात भाजप नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी विरोधी पक्षातील लोकांबद्दल किंवा विकासाबद्दल बोलण्याऐवजी भाजपच्याच नेत्यांवर तोंडसुख घेतले. अक्कलकोट विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधी गटातील भाजपच्या लोकांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावून सचिन कल्याणशेट्टी यांचा पत्ता कट करण्याचा डाव टाकला आहे.

अक्कलकोट तालुक्यात भाजपमध्ये वाद

अक्कलकोट विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 2 देशमुखात असलेली राजकीय दरी या ठिकाणीही पाहायला मिळाली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांना डावलून विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.

यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख म्हणाले की, पक्षात कुरघोडी करणारा नेता संपतो. मात्र, कार्यकर्ता संपत नाही, हे प्रत्येक नेत्यांनी लक्षात ठेवले. उमेदवारी कोणाला द्यायची, हे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी ठरवलेले आहे. त्या पद्धतीने मतदारसंघात सर्वे चालू आहे. या सर्वेमध्ये जनता जनार्दन ठरवेल, त्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न पक्षाचा राहील. इच्छुकांनी आपल्या स्तरावरील गट-तट व वाद मिटवून माझ्यापर्यंत आल्यास त्याला निश्‍चितच उमेदवारी देण्याबाबत विचार करु, असे सांगत पक्षाने ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. त्याचे सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.

अक्कलकोट तालुका विकासापासून वंचित असून तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी तालुक्यात भाजप आमदार निवडून येणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे म्हणाले, तानवडे व खेडगी परिवाराला डावलून कारभार करणाऱयांना सडेतोड उत्तर देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. गेल्या 4 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जे यश मिळाले, ते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांमुळे मिळाले आहे. मात्र, काही मंडळी स्वतःच्या स्वार्थापोटी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक निवडणूकीत पालकमंत्र्यांचा सहभाग असतानाही त्यांचे नाव जाणिवपूर्वक डावलले जात आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. पालकमंत्र्यांनी अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी मुबलक निधी दिलेला आहे. अक्कलकोट विधानसभा निवडणूकीसाठी पालकमंत्री स्वत: इच्छुक असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

तालुका अध्यक्ष कल्याणशेट्टीवर बसलिंगप्पा खेडगींची टीका

मी निष्ठावान आहे. मी पक्षाशी गद्दारी केलेली नाही, पक्षाशी एकनिष्ठ राहून तालुक्यातील गुंडगिरी तोडून काढली. मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. तसेच म्हेत्रेंना सडेतोड उत्तर देणारा मी एकमेव कार्यकर्ता आहे. स्वत:चे घर जाळून पक्ष वाढविण्याचे काम खेडगी परिवाराने केले आहे, असे सांगत खेडगी यांनी सचिन कल्याणशेट्टीवर टीका केली.

यावेळी नगराध्यक्षा शोभा खेडगी, महेश हिंडोळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, चंद्रकांत बोधले यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख व भाजप पक्ष चांगला असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details