सिंधुदुर्ग- सवतीचे पोर या भावनेतून केंद्र सरकार महाराष्ट्राकडे पाहते आहे. केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे वादळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. वादळ होऊन सर्व काही संपून गेल्यानंतर पथक येथे येत आहे. त्यांना इथले काय दिसणार असा प्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे तसेच जिल्ह्याला पुरेसा ऑक्सिजन मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विनायक राऊत यांचा केंद्रावर आरोप
नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळात कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, पालघर जिल्ह्यातून पाहणी केल्यानंतर आता ते पथक रायगडमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचाही ते दौरा करणार आहेत. त्याच दौऱ्यावरून आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देताना केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे आणि ‘सवतीचे पोर’ या भावनेतून केंद्र सरकार महाराष्ट्राकडे पाहते आहे, असे म्हणत केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.