सिंधुदुर्ग- संचारबंदी, लॉकडाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कलिंगड शेती हातची वाया गेली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक शेतात तसेच पडून राहिल्याने लाखो रुपयांना जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकेनासे झाले आहेत.
शेतकरी बांधवांना नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे कलिंगड मोठ्या प्रमाणावर आले आहे. नेमके विक्री करण्याच्या वेळीच देशावर संकट कोसळले. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशच ठप्प झाला. देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापार ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीलाही कलिंगडे कोणी घेण्यास तयार नाहीत. उठावच नसल्याने हे पीक शेतात तसेच पडून राहिले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर जनवरांना कलिंगड खाऊ घालण्याची वेळ आली आहे.