सातारा- काँग्रेस दुभंगल्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. त्यावेळी कराड दक्षिण मतदारसंघाने त्यांचे डिपॉझिट वाचवले होते. चव्हाण ज्या तालुक्यातील आहेत. त्या पाटण तालुक्याने त्यांना फक्त ५००० मते दिली होती. इतके हे लोकप्रिय नेते आहेत, असा घणाघात माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनी केला आहे.
चव्हाणांनी कायम आयत्या पिठावर रेघोट्या रांगोळ्या ओढण्याचे काम केल्याची टीका करत उंडाळकरांनी चव्हाणांवरील हल्लासत्र सुरूच ठेवले आहे. कराड दक्षिणमधील रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या प्रचारार्थ कराडच्या मंगळवार पेठेत झालेल्या सभेत विलासकाकांनी चव्हाणांवर पुन्हा निशाणा साधला. यावेळी सुभाष खोत, संजय कांबळे, सतीश पाटील, धनाजीराव पाटील, मानसिंगराव पाटील, प्रकाश जाधव, दिलीप घोडके, बाळासाहेब मोहिते, नदीम सुतार, विजय मुठेकर, अंकुश शिंदे उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंब गेली ५० वर्षे सत्तेच्या वर्तुळात होते आणि आहे. परंतु, त्यांनी कोणतेही रचनात्मक विकासाचे काम केलेले नाही. योगदान शुन्य असताना कायमच ते आयत्या पिठावर रेघोट्या ओढत राहिल्याचा आरोप उंडाळकरांनी केला. दिल्ली दरबारी यशवंतराव चव्हाणांच्या चुगल्या करून यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच त्यांनी यशवंत विचारांचे राजकारण उद्धवस्त करण्याचे काम केले. नकारात्मक विचारसरणी आणि द्वेषाचे राजकारण करणार्या या प्रवृत्तीचा कराडकरांनी मतपेटीद्वारे पराभव करावा, असेही उंडाळकर म्हणाले.
गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून कराड शहरासाठी किती विकास निधी आणला, हे प्रथम पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर करावे. आणि मगच मुख्यमंत्री असताना अमुक केले तमुक केल्याची टिमकी वाजवावी, असे आव्हान बाळासाहेब मोहिते यांनी चव्हाणांना दिले. २००९ ला कराड शहराचा दक्षिणमध्ये समावेश झाला. त्यावेळी विलासकाकांनी त्रिशंकू भाग कराड शहरात समाविष्ट करण्याबरोबर घरकुलाचा प्रश्न, रस्त्यांसाठी निधी, यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाच्या संरक्षण भिंतीचा प्रश्न, घनकचरा प्रकल्पासाठी २५ एकर जागेसह नगरपालिकेला आमदार फंडातून विविध कामांसाठी निधी मंजूर करून दिला होता. त्याचे अवलोकन कराडकरांनी करण्याचे आवाहन मोहिते यांनी केले.