कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकरांचे सुपूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी कराड दक्षिणची पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यात ते पराभूत झाले. मात्र, निकालाच्या दुसर्याच दिवशी त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विलासकाका उंडाळकरांनी बुधवारी (दि.30) आभार मेळावा घेतला आहे. त्या मेळाव्यात ते काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -सातारा जिल्ह्यात पाटणच्या सुपुत्रांचा बोलबाला!
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 2014 पर्यंत कराड दक्षिणमध्ये केवळ दोनच आमदार झाले. 1980 पर्यंत दिवंगत यशवंतराव मोहिते आणि 1980 ते 2014 पर्यंत विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व केले. असा राजकीय इतिहास असणारा कराड दक्षिण हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. यशंतराव मोहिते हे पूर्वी शेकापमध्ये होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. विलासकाका उंडाळकर हे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी. त्यांनी आजअखेर यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारापासून आणि काँग्रेस विचारांपासून कधीही फारकत घेतलेली नाही. 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यात कराड शहर, मलकापूरसारखे शहर कराड दक्षिणेत आले. तरीही उंडाळकरांनी बाजी मारली. मात्र, वर्षभरातच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठविले. चव्हाण आणि उंडाळकर हे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. अशातच 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली गेली. त्यामुळे कराड दक्षिणची उमेदवारी उंडाळकरांऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली. सलग सातवेळा आमदार झालेल्या उंडाळकरांनी चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी केली. तसेच भाजपने डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे तिरंगी लढत होऊन चव्हाण विजयी झाले. उंडाळकर दुसर्या आणि भोसले तिसर्या क्रमांकावर राहिले होते.