सातारा - मांढरदेवच्या घाटात काल सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. संदीप शांताराम कदम (वय ३६, मूळ गाव निघावणी, पो. पालवणी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, हल्ली रा. कल्याण) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी सापडलेला मृतदेह -
मांढरदेव येथील काळुबाईच्या जाळी लगत मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दरीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. वाई पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटलांनी खबर दिल्यामुळे आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती.
वर्दी घेऊन आला होता कोल्हापूरला -
संदीप कदमची पत्नी व नातेवाईकांनी वाई येथे येऊन मृतदेह ओळखला. मृत व्यक्ती टॅक्सीचालक असून तो खाजगी भाडे व ओला कंपनीची भाडे करत होता. 20 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता तो कळंबोली ते कोल्हापूर वर्दी (भाडे) घेऊन गेला होता. 21 डिसेंबरला दुपारी त्याचे पत्नीशी बोलणे झाले. त्यावेळी त्याने कोल्हापूर येथे असल्याचे सांगितले. त्या रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्याचा संपर्क होता. परंतु, 22 डिसेंबरपासून नातेवाईकांशी त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे 24 डिसेंबरला कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप कदम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली.
अद्याप खूनाचे कारण अस्पष्ट -
कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोध घेतला तरी तो सापडले नाही. मंगळवारी मांढरदेव गावच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाबाबत पत्नी संजना संदीप कदम यांना कल्याण पोलिसांनी माहिती दिली. संजना कदम यांनी दीर व पतीच्या मित्रासोबत वाईला येऊन मृतदेह पहिला असता, तो संदीप शांताराम कदम यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झाले नाही.
गुन्हा कल्याण पोलिसांकडे वर्ग -
वाई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी पतीचे अपहरण व खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मांढरदेव येथील दरीत फेकल्याची तक्रार संदीपच्या पत्नीने नोंदवली. हा गुन्हा कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.