महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 24, 2020, 7:16 AM IST

ETV Bharat / state

स्वाभिमानीचा साताऱ्यातील आक्रोश मोर्चा रद्द; कोरोना आणि आचारसंहितेमुळे परवानगी नाकारली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा साठी आंदोलक सज्ज होते. मात्र, शिक्षक व पदवीधर मतदार संघाची सातारा जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे पोवई नाका सातारा ते प्रीतीसंगम कराड या दरम्यान काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा रद्द करण्याची मागणी पोलिसांनी केली.

swabhimani-shetakari-sanghatna-aakrosh-morcha-cancelled-due-to-corona-in-satara
स्वाभिमानीचा साताऱ्यातील आक्रोश मोर्चा रद्द

सातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सातारा ते कराड पायी आक्रोश मोर्चा रद्द केला आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. कोरोना संक्रमणाची वाढती भीती व पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या आचार संहितेचे कारण देत पोलीसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चा रद्द करण्यात आला.

स्वाभिमानीचा साताऱ्यातील आक्रोश मोर्चा रद्द

मोठा पोलीस फौजफाटा -
एकरकमी एफआरपी व दोनशे रुपये उचल या मागण्यांबाबत पाच डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय न झाल्यास शेतकरी पुन्हा हातात दांडके घेऊन रणांगणात असेल आणि रणांगणाची भूमी कराड असेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. दि. 23 ते 25 डिसेंबरदरम्यान सातारा ते कराड शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. मोर्चाची संभाव्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या नेतृत्वात जय्यत पोलीस बंदोबस्त पोवई नाक्यावरील शिव पुतळ्याजवळ तैनात करण्यात आला होता.

जिल्हा प्रशासनाची विनंती -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा साठी आंदोलक सज्ज होते. माजी खासदार राजू शेट्टी यांचे पोवई नाक्यावर आगमन झाले. शेट्टी यांनी शिव पुतळ्याला हार अर्पण केला. मोर्चा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. जिल्हा प्रशासनाने पोलीसांच्या मार्फत लेखी पत्र राजू शेट्टी यांच्या स्वाधीन केले. शिक्षक व पदवीधर मतदार संघाची सातारा जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे पोवई नाका सातारा ते प्रीतीसंगम कराड या दरम्यान काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात यावा, अशी विनंती जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली.

५ डिसेंबरला होणार बैठक -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांच्या अनुषंगाने ५ डिसेंबर रोजी नियोजन भवनात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्याने राजू शेट्टी यांनी सातारा ते कराड पायी मोर्चा रद्द केल्याचे जाहीर केले.

अन्यथा दांडके हातात घेऊ -
जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पायी मोर्चा स्थगित केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय न झाल्यास शेतकरी हातात दांडके घेतल्याशिवाय राहणार नाही. 2013 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. मात्र त्या आंदोलनाची रणभूमी कराड असेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -'शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने पुनर्विचार करावा', मंत्री उदय सामंतांचा सल्ला

हेही वाचा -'हे तर जनतेचं शोषण'... परभणीत भाजपातर्फे वीज बिलांची होळी

ABOUT THE AUTHOR

...view details