महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2019, 2:22 AM IST

Updated : Nov 25, 2019, 3:01 AM IST

ETV Bharat / state

जे पेरलं तेच उगवलं! वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांना निसर्गाचं उत्तरं - शालीनीताई पाटील

जे पेरलं तेच उगवलं या म्हणीचा दाखला देत माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

शालीनीताई पाटलांचा पवारांना टोला

सातारा - जे पेरलं तेच उगवलं या म्हणीचा दाखला देत माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 1978 साली शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला होता. आज त्याच शब्दात निसर्गाने शरद पवारांना उत्तर दिले असून, सख्खा पुतण्याच तुमच्याविरुद्ध गेला असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शालीनीताई पाटील यांनी प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिखर बँकेतील कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीपोटी सत्तेचं पांघरून घेण्याचा अखेरचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत असल्याचेही त्या म्हणाल्या. तुम्हाला सत्तेचं पांघरून थोडावेळ उपयोगी पडेल परंतू, एवढा मोठा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी कोणीही केंद्रीय वरिष्ठ नेते तयार होणार नाहीत. या भ्रष्टाचारामध्ये अजित पवार यांच्या इतकेच शरद पवारही जबाबदार असल्याचे शालिनीताई म्हणाल्या.

शालीनीताई पाटलांचा पवारांना टोला

शालीनीताई पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. 1978 साली काँग्रेसमधून 40 आमदारांसह बाहेर पडून शरद पवार यांनी पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सरकार बनवले होते. वसंतदादा पाटील यांच्याशी बंडखोरी करत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दगाफटक्याचे राजकारण केल्याचा आरोप आजही त्यांच्यावर केला जात आहे. यानिमित्ताने 'दादांच्या पाठीत खंजीर खुपसला' अशी म्हण राजकारणात रूढ आहे.

यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या की, त्यावेळी जुनी काँग्रेस व नवीन काँग्रेस असे दोन पक्ष होते. वसंतराव मुख्यमंत्री तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी आमदारांमध्ये काही गडबड चालल्याचे वसंतराव पाटील यांच्या कानावर होते. स्वतः शरद पवार यांनी वसंतदादांना बंडखोरी करणार नाही अशी खात्री दिली होती. मात्र, प्रत्यक्षात सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर शरद पवार समर्थक आमदारांसह विरोधी गटात जाऊन बसले. सभागृहात सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आणि नंतर वसंतदादांनी राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

वसंतदादांच्या पाठीत शरद पवार खंजीर खुपसून गेले. आज त्याच शब्दांमध्ये निसर्गाने त्यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही तर वसंतरावांच्या नात्यागोत्याचे नव्हता, परंतू आज तुमचा सख्खा पुतण्या तुमच्याविरुद्ध गेला. उद्या ते राहतील न राहतील माहीत नाही. परंतू, आज ते या राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याचे शालीनीताई म्हणाल्या.

अजित पवार यांच्याइतकेच शरद पवारही जबाबदार
शिखर बँकेच्या घोटाळ्यात अजित पवार यांच्याइकेच शरद पवारही जबाबदार आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचे समर्थन होणार नाही. तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर बसावे असे मला वाटत नसल्याचेही पाटील् म्हणाल्या.

Last Updated : Nov 25, 2019, 3:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details