महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2021, 9:34 PM IST

ETV Bharat / state

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तोंडावर साताऱ्यात 'माझे मुल-माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुले कमी प्रमाणात बाधित झाली. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या तोंडावर साताऱ्यात 'माझे मुल-माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या तोंडावर साताऱ्यात 'माझे मुल-माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ

सातारा - कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुले कमी प्रमाणात बाधित झाली. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यासाठी आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असून, माझे मूल-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका व शिक्षक यांना मुलांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

'माझे मुल-माझी जबाबदारी'चा शुभारंभ'

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या 'माझे मुल-माझी जबाबदारी' या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. "कोरोनाचा मुलांसाठी संभाव्य धोका लक्षात घेऊन कुटुंब व सामाजिक स्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, मुले व पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करुन त्यांना धीर देणे व कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देवून, त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाची माहिती होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यशाळा घ्याव्यात, प्रत्येक आठवड्याला या उपक्रमाचा आढावा घ्यावा,'' असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

'विविध विभागांवर जबाबदारी'

0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा, 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण विभाग, 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, समाज कल्याण विभागाच्या शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी समाज कल्याण विभाग, 0 ते 18 वयोगटातील निरीक्षण गृह व बालसुधार गृहातील मुलांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही उपयुक्त ठरणार आहे. येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सर्वांनी एकत्रित येवून लढू, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

'ट्रेसिंग, टेस्टींग व उपचार ही त्रिसुत्री'

आजकाल मुले ही मैदानी खेळाकडे दूर्लक्ष करीत असून मोबाईलमध्ये जास्त मग्न राहत आहे. त्यांना खेळाबरोबरच व्यायाम, योगाचे महत्व पटवून दिले पाहिजे. माझे मुल-माझी जबाबदारी या उपक्रामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. ट्रेसिंग, टेस्टींग व उपचार हा त्रिसुत्री कार्यक्रम राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी माझे मूल-माझी जबाबदारी या उपक्रमाची माहिती दिली.

'चित्रफितीचे अनावरण'

या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी 'माझे मूल-माझी जाबाबदारी' उपक्रमाच्या आदर्श कार्यप्रणाली, लोगो, पोस्टरचे, प्रकाशन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या चित्रफितीचे अनावरण या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details