सातारा - सातारा (Satara) जिल्ह्यातील असं एक गाव आहे, जिथं लोक गुरा-ढोरांसह गावसोडून काहीकाळ वेशीबाहेर जाऊन राहतात. भूत-पिशाच्याचा वावर या काळात गावात असतो, अशी जुन्या लोकांची धारणा आहे. आज काळाच्या ओघात भुताखेतांची अनामिक भिती राहिली नसली तरी सुर्यास्त ते सुर्योदय याकाळात गाव ओस टाकण्याची प्रथा कायम आहे. जावळी तालुक्यात (Jawali Taluka) मेढ्याच्या दक्षिणेस साधारण ८-१० किलोमीटरवर गोंदेमाळ हे गाव (Gondemal Village) आहे. ५ दिवसांच्या वेशीवरील मुक्कामानंतर ग्रामस्थांनी देवाचा कौल घेऊन गावात नुकताच प्रवेश केला.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा साधारण ५० उंबऱ्याचे टेकडीवर वसलेलं हे छोटोसं गाव. गावात 'पार्टे' या आडनावाची भावकी मोठी. साधारण ९० टक्के पार्टे आडनावाचे लोक गावात राहतात. गावातील काही मंडळी रोजगाराच्या निमित्ताने मुंबईला स्थाईक असतात. दर तीन वर्षांतून एकदा ग्रामस्थ गावसोडून शेजारच्या गावात राहण्याची इथं पुर्वंपार प्रथा आहे.
देवाचा कौल घेऊनच पुर्नप्रवेश -या विषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना गोंदेमाळचे सरपंच पुंडलिक पार्टे यांनी सांगितले, तीन वर्षांतून एकदा गुडीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्थ गाव ओस ठेवून गुरा-ढोरांसह गावाबाहेर निघून जातात. म्हाते बुद्रुक या शेजारच्या गावातील मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. ५, ७, ९ किंवा १३ अशा विषम दिवसांनी काळभैरवनाथाला कौल लावला जातो. देवाने कौल दिला तरच लोक गावात परत रहायला जातात. त्याप्रमाणे यंदा ५ व्या दिवशी कौल घेऊन ग्रामस्थांनी पुन्हा गोंदेमाळ गावात प्रवेश केला आहे.
भूत-पिशाच्चांचा वावर -गावसोडून जाण्याच्या या प्रक्रीयेला स्थानिक लोक 'पळ आला' असं म्हणतात. गाव सोडून गेलेले लोक इतर कामांसाठी दिवसा गावात जात असले तरी घरात चुल पेटवली जात नाही. सुर्यास्तापुर्वी पुन्हा गावाची वेस गाठली जाते. या काळात गावात भूत-पिशाच्चांचा वावर असतो, अशी पुर्वीच्या लोकांची धारणा होती. आज एकविसाव्या शतकात स्थानिकांच्या मनातील अनामिक भिती कमी झालेली दिसत असली तरी गाव निर्मनुष्य ठेवण्याची परंपरा कायम आहे.
वंशवाढीसाठी पडली प्रथा -या प्रथेविषयी बोलताना ग्रामस्थ शांताराम पार्टे ' म्हणाले, पुर्वी कधी गावात वंश वाढत नव्हता. त्यामुळे गाव काही काळासाठी निर्मनुष्य ठेवण्याची पद्धत अनुसरण्यात आली. पुढं वंशवाढ झाल्याने 'पळ' पाळण्याची हीच प्रथा रुढ झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. आमच्या आजा-पंजापासून हे ऐकत आलोय. त्यामुळे नेमकं कधी ही प्रथा गावात पडली हे सांगणं कठीन आहे. भुताटकी वगैरे काही प्रकार नाही. तसं कोणी पाहिलं ही नाही. पुर्वी लोक म्हणायचे; तेच पुढे सांगितले जाते. परंतू आम्हां ग्रामस्थांमध्ये अशी कोणतीही भिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -Silver Oak Attack Case : सदावर्तेंच्या अटकेनंतर आता जयश्री पाटील नॉटरिचेबल.. पोलिसांकडून शोध सुरु
म्हणे होत नाही चोरी -संपुर्ण गाव निर्मनुष्य असतं पण या काळात गावात चोरीचा प्रकार कधी घडला नसल्याचा दावा गणपत पार्टे यांनी यावेळी केला. पळ असतो त्यावेळी आम्हीं ग्रामस्थ गावात जातो. सोबत जेवण बांधून आणलेले असते. मात्र संध्याकाळी पुन्हा म्हाते या गावात केलेल्या तात्पुर्त्या वस्तीवर जाऊन रहातो. सुर्यास्तानंतर गावात कोणीही थांबत नाही. घरातील चुलही पेटवली जात नाही, असे लक्ष्मण पार्टे यांनी सांगितले. जावळी तालुक्यात आठ ते दहा गावात चोरीच्या घटना घडल्या. आमचं अख्खं गाव निर्मनुष्य होतं. पण चोरीचा प्रकार आमच्याकडे घडला नाही, असा पुनरुच्चार शांताराम पार्टे यांनी केला. म्हाते गावच्या मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र राहतात. एकत्रच जेवनाच्या पंगती बसतात. म्हाते ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य असते, असे ज्योतिबा पार्टे यांनी सांगितले.
ही अंधश्रद्धाच -महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार म्हणाले, गावात विशिष्ठ दिवशी भूतपिशाच्याचा वावर असतो असं मानन ही अंधश्रद्धाच आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी अनेक वर्षांपुर्वी गोंदेमाळ गावात प्रबोधन केले होते. मात्र अजूनही विज्ञानयुगात काही मंडळी भूत-पिशाच्या कल्पनांवर विश्वास ठेवत असतील तर स्थानिक तरूणांच्या सहकार्याने 'अंनिस' गावात प्रबोधनाचा कार्यक्रम राबविण्यास तयार आहे. हा बुरसटलेला विचार गावातून दूर होण्यासाठी समितीचे सहकार्याचे एक पाऊल पुढे असेल.
हेही वाचा -धक्कादायक: वेळेवर दिला नाही नाश्ता, सासऱ्याने मारली सुनेला गोळी