सातारा - प्रतापगडावर सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने १८ वर्षांपासून शिवप्रताप दिन साजरा केला जातो. परंतु किल्ल्यावर अफजल खानाचा वध झाला ती शिवप्रतापाची जागा खुली करावी, अशी मागणी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक, माजी आमदार नितीन शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.
प्रेरणादायी भूमी
शासकीय विश्रामगृहात बोलताना ते म्हणाले, की स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करून आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले. हा दिवस आपण शिवप्रतापदिन म्हणून अभिमानाने साजरा करतो. खानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा प्रताप आहे. या शिवप्रतापामुळे युवक, समाजामध्ये राष्ट्रीय विचार व दहशतवाद विरोधामध्ये लढण्याची प्रेरणा मिळते. परंतु हा परिसर बंदिस्त असल्यामुळे अफजल खान वधाची जागा, अफजल खान व सय्यद बंडाची कबर, शिवाजी महाराजांचा प्रताप शिवभक्तांना, युवकांना, नागरिकांना, राज्यातील व परदेशातील पर्यटकांना पाहता येत नाही.