महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 15, 2020, 11:06 AM IST

Updated : Mar 15, 2020, 12:06 PM IST

ETV Bharat / state

माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निधन

फलटणचे सुपुत्र माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे आज (रविवार) पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Fomer MP Hindurao naik nimbalkar passs away
हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निधन

सातारा -फलटणचे सुपुत्र माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे आज (रविवार) पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे वडील होते. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजित क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

फलटण येथील आईसाहेबनगर येथे सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, सुपुत्र माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

पुणे येथील खासगी इस्पितळात दीर्घ आजारावर उपचार सुरु असताना हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून आज फलटण शहरामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला आहे.

15 ऑगस्ट 1945 रोजी त्यांचा जन्म फलटण येथे झाला. एक संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा उदय झाला होता. राजकारणाबरोबर पत्रकारितेमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. फलटणमधील माजी आ. कॉ. हरिभाऊ नाईक-निंबाळकर यांच्या 'शिवसंदेश' या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक तसेच सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते माजी कार्याध्यक्ष होते. अतिशय संघर्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. युवक कॉंग्रेसमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या राजकीय कार्यकर्तृत्वाची चमक दाखवली होती. त्यानंतर ११ लोकसभेत 1996 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. सुमारे २ वर्षे त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केले. आपल्या अल्प खासदारकीत फलटण-लोणंद व लोणंद-बारामती ही रेल्वेसेवा सुरु करण्यासंबंधीचा प्रस्ताव माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासमोर मांडून तसेच याचा वेळोवेळी पाठपुरावा करुन ही योजना मंजूर केली होती. सुमारे 22 वर्षानंतर त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक-निंबाळकर या मार्गावर प्रत्यक्षात रेल्वे सुरु करुन त्यांचे स्वप्न साकार केले.

फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढल्या. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात खळखळत आहे. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुमारे 20 वर्षापूर्वी त्यांनी स्वराज ऍग्रो ची स्थापना करुन निंभोरे येथे स्वराज दूध डेअरीची स्थापना केली होती. तसेच त्यांनी उपळवे येथील माळरानावर फलटण तालुक्यातील तिसरा सर्वात मोठा साखर कारखाना उभारुन हिंदुराव नाईक-निंबाळकर काहीही करु शकतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले होते.

फलटणच्या किंबहुना सातारच्या राजकारणातील एक ढाण्या वाघ हरपला, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी 11 पर्यंत त्यांचे पार्थिव फलटण येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर फलटण येथील आईसाहेब नगर (मलठण) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

Last Updated : Mar 15, 2020, 12:06 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details