सातारा -म्हसवड येथील बेकायदेशीरपणे अस्तित्वात ठेवलेल्या सरंजामशाहीचा बिमोड करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव दहिवडी येथे आंदोलन करणार आहेत. प्रांत कार्यालयासमोर ११ फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिली.
राजकीय दबावातून कृत्ये
पाटणकर म्हणाले, ''ब्रिटिश राजवट संपुष्टात आली, देशात लोकशाही आली. परंतु म्हसवड भागातील सरंजामशाही अजुनही सरकारने अस्तित्वात ठेवली आहे. कुळांच्या जमिनीचे आम्हीच मालक आहोत, असे कागदोपत्री प्रशासन यंत्रणेस बतावणी करुन येथील सरंजामशाहांनी त्यांच्या वारसांची नावे आज अखेर शासन यंत्रणेवर राजकीय दबाव टाकून सात-बारा सदरी ठेवली आहेत. फार वर्षांपासून येथील कुळधारक शेतकरी कसत असलेल्या शेतजमिनीवर मालकी हक्काची १६ आणेवारीची नोंद असतानाही सरजामशहांनी कुटुंबांचे बोगस कागदोपत्री वाटपपत्र केले. प्रशासनावर दबाव टाकून आणखी जादा १६ आणेवारी नोंद करुन ३२ आणेवारीचे सातबारा उतारे अस्तित्वात आणल्याची कमाल करून दाखवली आहे.