सातारा -तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा उत्तर कर्नाटकात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. कोयना धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने यापूर्वीच केली होती. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच १ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्यात आले आहे. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे पुन्हा तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
कधी सोडले पाणी? - कर्नाटक सरकारकडून पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली होती. सरकारचा आदेश मिळताच कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिटमधून २१०० क्युसेक्स आणि कोयना धरणाच्या विमोचकाव्दारे २१०० क्युसेक्स असा एकूण ४२०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. कर्नाटक सरकारने ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यापैकी एक टीएमसी पाणी सोडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली होती. ते पाणी सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्राला दुजाभाव -महाराष्ट्रातून पाणी पाहिजे असल्यास कर्नाटक पाण्याची मागणी करते. मात्र महाराष्ट्रात पूर परिस्थिती असल्यावर कर्नाटकातील धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी चालढकल केली जाते असा अनुभव आहे. त्यामुळे आता राज्यसरकार काय भूमिका घेते याकडे लोकांचे लक्ष आहे.