कराड (सातारा) - नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कराडच्या प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून दिल्लीला रवाना झाले. सरकार जोपर्यंत हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कराडमधील 'बळीराजा'चे पदाधिकारी आंदोलनासाठी दिल्लीला रवाना
नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कराडमधून दिल्लीला रवाना झाले आहेत.
बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन नवीन कायदे हे शेतकरी आणि शेती व्यवस्था उध्दवस्त करणारे असल्याचा आरोप पंजाबराव पाटील यांनी केला. तसेच उत्तर भारतातील शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून आम्ही देखील आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री झाल्यानंतर हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे म्हटले गेले. म्हणून आम्ही त्यांच्या समाधीला वंदन करूनच आंदोलनासाठी निघालो आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्याच मातीत आम्ही जन्मलो आहोत. त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही सुद्धा आंदोलनातून माघार घेणार नाही, असे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.