सांगली - जत तालुक्यातील बाज येथील एका अल्पवयीन मुलाने आईला भेटायला मिळत नसल्याच्या नैराश्यातून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने रत्नागिरीमध्ये आत्महत्या केली. या घटनेने बाज गावात हळहळ व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये माय-लेकाची ताटातूट झाल्यामुळेच हा प्रकार घडला आहे.
लॉकडाऊन उठला जीवावर.. आईच्या ओढीने जतमधील अल्पवयीन मुलाची आत्महत्या - सांगली लॉकडाऊन आत्महत्या
जत तालुक्यातील बाज येथील एका अल्पवयीन मुलाने आईला भेटायला मिळत नसल्याच्या नैराश्यातून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जत तालुक्यातील बाज येथील भाऊसाहेब थोरात कुटुंबिय कामानिमित्त रत्नागिरीत वास्तव्यास आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर थोरात यांनी पत्नी व एका मुलास गावी पाठवले होते. तर मोठा मुलगा प्रशांत यास आपल्या जवळ थांबून घेतले होते. परंतु लॉकडाऊन वाढतच गेल्याने त्यांना गावाकडे येता आले नाही. शिवाय प्रशांत याचे वडील ट्रक चालक आहेत.
चार दिवसापूर्वी अत्यावश्यक सेवा निमित्त कामावर जावे लागले. त्यांनी कामावर जाताना मुलाला रत्नागिरीतून जतला गावी पाठवण्यासाठी खूप आटापिटा केला. त्यातच प्रशांत सतत आईच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. मात्र, कुठलाच पर्याय नसल्याने वडिलांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईच्या विरहाने व्याकूळ झालेल्या अल्पवयीन प्रशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रत्नागिरी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करत आहेत.