महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2020, 7:21 PM IST

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात दोन कालवडीचा जागीच मृत्यू, परिसरात दहशत

माणिक विश्वास काळूगडे यांचे ढगेवाडी फाट्याजवळ शेतात जनावराचे शेड आहे. शेडमध्ये पाच होस्टन जातींच्या गाई होत्या. नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करुन बुधवारी रात्री सात वाजता जनावरांना चारा पाणी करून माणिक हे घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी दूध काढण्यासाठी ते शेडवर गेले असता दोन कालवडी मृत असल्याचे दिसून आले.

Sangli
ठार झालेल्या कालवडी

सांगली- बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन कालवडी जाग्यावरच ठार झाल्या आहेत. ही घटना कार्वे रोडवरील ढगेवाडी फाट्याजवळील जनावराच्या शेडमध्ये घडली. ऐतवडे बुद्रुक येथील शेतकरी माणिक विश्वास काळूगडे यांच्या या कालवडी होत्या.

वाळवा तालुक्यातील माणिक विश्वास काळूगडे यांचे ढगेवाडी फाट्याजवळ शेतात जनावराचे शेड आहे. शेडमध्ये पाच होस्टन जातींच्या गाई होत्या. नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करुन बुधवारी रात्री सात वाजता जनावरांना चारा पाणी करून माणिक हे घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी दूध काढण्यासाठी ते शेडवर गेले असता दोन कालवडी मृत पडल्याचे दिसून आले. यामुळे माणिक काळूगडे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर कालवडीच्या गळ्याजवळील भाग व पोट फाडले असल्याने बिबट्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. हा हल्ला रात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील महिन्यातही बिबट्याने केल्या दोन गाई, आठ शेळ्या फस्त

सध्या शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यासाठी घर खर्च व शेतीसाठी लागणारी आर्थिक मदत ही जनावरांच्या दूध संकलनातून होते. ग्रामीण भागातील सर्रास शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे सांभाळत आहेत. परंतु मागील चार महिन्यापासून वाळवा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे बिबटयांची शिकार बनत आहेत. मागील महिन्यात याच गावातील शेतकऱ्यांच्या दोन देशी गाई व आठ शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. तेव्हाही वनविभागाचे अधिकारी आले आणि पंचनामा करून गेले. पण कारवाई शून्य. एक महिना होतो न होतो तोपर्यंत बुधवारी रात्री पुन्हा दोन कालवडी बिबट्याने फस्त केल्याने परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.

पशुधन विकास अधिकारी डॉ. देवकुळे व राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. तर संबधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा. सध्या पशुहानी चालू आहे. मनुष्यहानी झाल्यावर वनविभाग लक्ष देणार का असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details