महाराष्ट्र

maharashtra

सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणी प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

By

Published : Jul 16, 2019, 10:35 PM IST

Updated : Jul 16, 2019, 11:04 PM IST

सामूहिक बलात्कार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी प्रियकरासह तिघा जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपी

सांगली- सामूहिक बलात्कार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी प्रियकरासह तिघा जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. विट्याच्या गार्डी येथे एका मुलीवर अमानुषपणे सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

सामूहिक बलात्कार व निर्घृण खून प्रकरणी प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा


सांगलीच्या विटा नजीकच्या गार्डी याठिकाणी १२ ऑक्टोबर, २०१२ रोजी एका १९ वर्षीय मुलीवर तिघा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार करत निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला होता. गार्डी येथील एक मुलगी प्रेम प्रकरणातून घरातून निघून गेली होती. त्यानंतर त्या मुलीचा १६ ऑक्टोंबरला विटा येथील एका पडक्या विहिरीत मृतदेह आढळून आला होता.


या प्रकरणी विटा पोलिसांच्या तपासामध्ये मृत मुलीचे गावातील लक्ष्या उर्फ लक्ष्मण सरगर याच्याशी प्रेम संबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी सरगर याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यात त्याने मित्रांसोबत मुलीवर सामूहिक बलात्कार करुन, तिचा गळा दाबुन खून करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विहिरीत फेकुन दिल्याची कबूली दिली होती. यानंतर विटा पोलिसांनी मृत मुलीचा प्रियकर लक्ष्मण सरगर, अनुज अर्जुन पवार व दादासो भास्कर आठवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. मंगळवारी खटल्याची अंतिम सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली.


यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण २० साक्षीदार तपासत सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी सदर घटना कोपर्डी बलात्काराच्या प्रमाणेच गंभीर असल्याची बाब निदर्शनास आणून देत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर परस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांचे पुराव्यावरुन आरोपींनी बलात्कार करुन खून केल्याचे सिद्ध झाले. यामुळे न्यायालयाने लक्ष्मण सरगर,अनुज अर्जुन पवार व दादासो भास्कर आठवले यांना दोषी ठरवत तिघांना मरेपर्यंत जन्मठेप, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ७ वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीने मृत मुलीच्या वारसांना प्रत्येकी २५ हजार रूपयांप्रमाणे एकुण ७५ हजार रुपये देण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

Last Updated : Jul 16, 2019, 11:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details