सांगली - यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांची मोठी गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांचे गट शेतीच्या माध्यमातून बियाणे उत्पादनाचा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग सांगलीच्या वाळवा तालुक्यात यशस्वी केला आहे. 170 शेतकऱ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 100 एकरावर 400 क्विंटल उच्च दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांच्या पिकाचे उत्पादन घेतले आहे.
गट शेतीतून 400 क्विंटल बियाणांचे उत्पादन
संपूर्ण महाराष्ट्रात गतवर्षी अतिवृष्टी आणि बोगस बियाणे याचा शेतकऱ्यांना आणि पीक उत्पादनाला मोठा फटका बसला. याचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची मोठी टंचाई भासणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून ग्रामबीजोत्पादन योजना राबविण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात सुमारे शंभर एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून 400 क्विंटल सोयाबीन बियाण्यांची क्षमता असणारा सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले आहे. तालुक्यातील 170 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आलेल्या सोयाबीनचे फुले संगम 726 या वाणाची लागवड करत उन्हाळी हंगामात यशस्वी सोयाबीन पीकाचे उत्पादन घेतले आहे.