सांगली -देशातील भाजप सरकार लोकशाही मारण्याचे पाप करत आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली. भाजपच्या या हुकूमशाही सरकारला आता टिकू देणार नाही, असा इशाराही मंत्री कदम यांनी दिला. केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्यांविरोधात सांगलीमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्याविरोधात काँग्रेसकडून देशभर गांधी जयंतीच्या (2 ऑक्टोबर) निमित्ताने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सांगलीमध्ये कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी आणि कामगार विधेयकाचा निषेध नोंदवत, तातडीने हे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शेतकरी व कामगार संघटनांनीही या आंदोलनात सहभाग घेत कृषी आणि कामगार कायद्याला विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा -विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बेमुदत संपावर जाण्याचा दिला इशारा
केंद्र सरकारचा नवा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी जाचक आहे. शेतकऱ्यांची केवळ लूट होणार असून शेतकऱ्यांची पंख या कायद्यामुळे छाटली जातील. कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिक फायदा होणार आहे आणि कामगारांची गळचेपी होणार आहे. केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी असल्याची टीकाही मंत्री कदम यांनी केली आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीला मारण्याचे पाप करत असून या हुकुमशाही सरकारला आता काँग्रेस टिकू देणार नाही, असा इशाराही मंत्री विश्वजीत कदम यांनी दिला.
हेही वाचा -दुर्दैवी..! चार वर्षांच्या दोघा जुळ्या बहिणींचा तलावात बुडूून मृत्यू