महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 13, 2021, 8:27 PM IST

ETV Bharat / state

मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सदाभाऊंचा 19 जूनपासून राज्यव्यापी दौरा

मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आमदार सदाभाऊ खोत येत्या 19 जूनपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. पुण्यातून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यानंतर भविष्यातील आंदोलनाची व्यापक दिशा ठरवली जाणार आहे.

sangli
sangli

सांगली - 'महाराष्ट्रातील मराठा आरक्षणापासून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 19 जूनपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनतेशी, शेतकऱ्यांशी संवाद साधून भविष्यातील आंदोलनाची व्यापक दिशा ठरवली जाईल. या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात पुणे येथून होणार आहे', असे आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहिर केले आहे. तसेच, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व आता माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी करावे, अशी मागणीही आमदार खोत यांनी केले आहे. ते सांगलीत बोलत होते.

आमदार सदाभाऊ खोत

'प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांचे आरक्षण घालवले'

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. 'राज्यात मराठा आरक्षणापासून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, सरकारकडून त्याची सोडवणूक केली जात नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांचे आरक्षण घालवले आहे', असे खोत यांनी म्हटले आहे.

'मोर्चे काढणारे आता कुठे आहेत?'

'राज्यातील विस्थापितांना आरक्षण मिळू नये यासाठी मराठा प्रस्थापित प्रयत्नशील आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना मराठा प्रस्थापितांनी मोठ-मोठे मोर्चे काढून केवळ तत्कालीन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता ते मोर्चे काढणारे कुठे आहेत?', असा सवाल खोत यांनी उपस्थित केला आहे.

'नरेंद्र पाटलांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे'

छत्रपती संभाजीराजे भोसले यांना यांच्यावरही खोत यांनी टीका केली. 'राजे याआधी पेशव्यांना नेमत होते. पण पेशवे कधीपासून राजांना नेमू लागले? असा खोचक सवाल सदाभाऊंनी केला. 'त्यामुळे आता त्याचा विचार झाला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबतीत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी पहिला लढा सुरू केला होता. त्यामुळे त्यांचे चिरंजीव असणारे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांच्याबरोबर आम्ही सर्व राहू', असे आमदार खोत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -धक्कादायक! 'इंस्टाग्राम'वर व्हिडिओ पोस्ट करून तरुणीची आत्महत्या, लातूरमधील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details