महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली लोकसभा उमेदवारीबाबत राजू शेट्टी स्पष्ट करणार भूमिका

सांगली लोकसभेच्या काँग्रेस आघाडीतील तिढयाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज सांयकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

By

Published : Mar 25, 2019, 4:35 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी

सांगली- सांगली लोकसभेच्या काँग्रेस आघाडीतील तिढयाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज सांयकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता सांगलीमध्ये राजू शेट्टी पत्रकार परिषद घेणार असून सांगलीची जागा काँग्रेसला सोडणार की लढवणार, याबाबत स्षटीकरण देणार आहेत. तसेच काँग्रेसमधून बंडखोरीचा इशारा दिलेल्या विशाल पाटलांना संधी देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस आघाडीतील सांगलीच्या लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. सुरुवातीला या ठिकाणी काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास कोणीही इच्छुक नसल्याने, मित्र पक्ष असणाऱ्या स्वाभिमान शेतकरी संघटनेला ही जागा देण्याचा निर्णय काँग्रेस वरीष्ठ पातळीवर घेण्यात आला होता. यावरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये जोरदार वादळ उठले आहे. मागील ३५ वर्षांपासून वसंतदादा घराण्याचे सांगली लोकसभा मतदारसंघावर प्रभुत्व राहिले आहे. आता या निवडणुकीमध्ये वसंतदादाच्या घराण्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप करत, वसंतदादा गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस भवनला टाळे ठोकून रविवारीपासून वसंतदादा गटाने आक्रमक पवित्रा घेत सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.

लोकसभा उमेदवारीमध्ये वसंतदादा घराण्याला डावलण्यात येत असल्याने काँग्रेसचे २ वेळा खासदार राहिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री व वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तर दुसर्‍या बाजूला प्रतीक पाटील यांचे धाकटे बंधू युवक नेते विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतवरण्याची तयारी करण्यात आली आहे. खासदारकीची उमेदवारी काँग्रेसलाच दिली पाहिजे, हा कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही, तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

भाजपचे तगडे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधात स्वाभिमानीकडे तगडा उमेदवार नाही. स्वाभिमानीकडे भाजपला टक्कर देणारा नेता सांगली जिल्ह्यात नाही. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details