सांगली : सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा समोर आले आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर : मळमळ,उलट्या, जुलाब प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवले. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्य परिस्थितीमध्ये या सर्वांची प्रकृती स्थिर, उत्तम असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, अन्न, औषध अधिकारी सुकुमार चौगुले यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेत विद्यार्थ्यांची प्रकृतीची चौकशी केली.
पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास : यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. या बाबत शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, वानलेसवाडी हायस्कूल येथील शाळेमध्ये 300 विद्यार्थी आहेत. त्यांना बचत गटाच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार दिला जातो. मात्र, आज या ठिकाणी पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ,जुलाब,उलटी, डोके दुखणे, त्रास सुरु झाला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवरच्या डॉक्टरांकडे या मुलांना दाखवण्यात आले.