सांगली - दोन दिवसांपूर्वी वानलेसवाडी येथील एका खासगी शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. पोषण आहाराचे सेवन केल्या नंतर विद्यार्थ्यांना मळमळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि उलट्यानांचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला होता. या विषबाधा प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. शाळेतील पोषण आहाराच्या तपासणीसाठी संबंधीत विभागाला आदेश देण्यात आले. त्यानुसार पोषण आहाराचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने घेतले आहेत. त्याचा लवकरच अहवाल प्राप्त होईल,असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिंदे गटाची आक्रमक भूमीका : या प्रकरणी शिंदे गटाच्या युवा सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विषबाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होईलच. पण ठेकेदाराचा हलगर्जीपणाही याला कारणीभूत आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची युवा सेनेने कोल्हापुरत भेट घेतली आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश माने, युवा नेते सचिन कांबळे, मनोज भिसे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे.