महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनगर युवा नेते गोपीचंद पडळकर यांची सिनेसृष्टीत एंट्री..

भाजपचे बंडखोर व धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर 'धुमस' या मराठी चित्रपटातून चंदेरी दुनियात करणार प्रवेश. राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.

By

Published : Feb 12, 2019, 8:34 AM IST

Gopichand Padalkar

सांगली - धनगर समाजातील तरुण नेतृत्व आणि राजकारणातील बहुचर्चित चेहरा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. भाजपचे बंडखोर व धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर 'धुमस' या मराठी चित्रपटातून चंदेरी दुनियात प्रवेश करत आहेत. त्यांच्या सिनेक्षेत्रातील एंट्रीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दक्षिणेत सिनेसृष्टी आणि राजकारण हे समीकरण नवं नाही. सिनेसृष्टीचा राजकारणात चांगला फायदा होतो, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे अनेक दिग्गज स्टार कलाकार राजकारणात नशीब आजमावतात. मात्र, राज्याच्या राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, धनगर आरक्षण लढ्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ते 'धुमस' या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. हा चित्रपट १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कथानकावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये गोपीचंद हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दक्षिणेतील डी. गोवर्धन यांनी केले आहे. तर साक्षी चौधरी ही या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. तर चित्रपटाचे कथानक, गीते आणि निर्मिती हे स्वतः गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर या दोघांनी केले आहे. दक्षिणात्य स्टाईलच्या धर्तीवर या चित्रपटाची निर्माती करण्यात आले आहे. गीत, फाईट आणि डान्स क्षमतेने वापर करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या या चित्रपटातील गाण्याचे ट्रेलर प्रसिद्ध झाले आहे. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच साऊथच्या स्टाईलचा प्रयोग या चित्रपटात करण्यात आला आहे. मात्र, यापेक्षा वेगळा प्रयोग म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी राजकारणातून थेट चंदेरी दुनियेत घेतलेली उडी. कारण गोपीचंद पडळकर हे जिल्ह्यातील भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सर्वपरिचित झाले आहेत. धनगर आरक्षणसाठी पडळकर यांनी उभरलेले आंदोलन यामुळे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले. गोपीचंद हे आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहेत. तर धनगर आरक्षण लढ्याच्या माध्यमातून हार्दिक पटेल यांना सांगलीमध्ये आणून राज्यातील सर्वच राजकारण्यांना मोठा धक्का दिला होता. त्याच्या राजकारणातुन थेट सिनेसृष्टीत केलेल्या एंट्रीमुळे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना तर धक्का बसला आहे. शिवाय जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details