सांगली - राज ठाकरे तुम्हाला रंग बदलायची सवय आहे का? असा खोचक सवाल केंद्रीय सामजिक न्याय मंत्री आठवले यांनी उपस्थित करत भाजपाला मनसे सोबत युती करणं परवडणारं नाही, असे मत देखील मंत्री आठवले यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर उध्दव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत, असा टोला शिवसेनेला लगावला आहे. ते आटपाडी येथे आयोजित निर्धार मेळाव्या मध्ये बोलत होते. दादागिरीची भाषा योग्य नाही. आटपाडी येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तुम्हाला भोंग्यांचा त्रास होत ठीक आहे, पण ? आपली भीम जयंती, गणेशोत्सव,नवरात्र याचा त्रास मुस्लिम समाजाला होत नाही का? मग त्यांना पण त्रास होता कामा नये. तुम्हाला सुद्धा त्रास होता कामा नये.जर तुम्हाला अजान ऐकायची नसेल तर ऐकू नका, पण दादागिरीची भाषा वापरणे योग्य नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे. हिंदु- मुस्लिमांना तोडण्याऐवजी जोडले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र म्हणतात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. नरेंद्र मोदी म्हणतात, बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करायचे आहे.
तुम्हाला रंग बदलायची सवय आहे का? -तसेच राज ठाकरेंची भूमिका समाजात वाद निर्माण करणारी आहे. त्यांची भूमिका सामाजिक नसून ती धार्मिक आहे. त्याचबरोबर राज ठाकरे हे शिवसेनेतुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या झेंड्यामध्ये भगवा, हिरवा, निळा पांढरा रंग होता. मग त्यांनी मनसेच्या झेंड्यातील सगळे रंग काढले. तुम्हाला रंग बदलायची सवय आहे का? आता फक्त भगवा रंग शिल्लक आहे. पण भगवा हा शांतीचे प्रतीक आहे. भगवा आग विजवण्याचे काम करतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी आग लावायचा प्रयत्न करू नये. भाजपा-मनसे युतीबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे यांच्याबरोबर युती करणे हे भाजपाला परवडणारे नाही. राज ठाकरे हे मोंदीच्या सब का साथ सबका विकास या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. आपण भाजपासोबत असल्याने मनसेची गरज नाही.