महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2020, 2:51 PM IST

ETV Bharat / state

कोरोनामुक्त कुटुंबाची आरती करून स्वागत; रत्नागिरीतील शिरगाव गावचा आदर्शवत उपक्रम

गेल्या चार महिन्यांमध्ये देशात हे चित्र तसे दुरापास्तच आहे. मात्र शिरगाव ग्रामपंचायतीने हा नवा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. बाधितांना आधार आणि सर्वांच्या पाठबळाची गरज आहे. मात्र, फार क्वचित हे चित्र दिसत आहे.

कोरोनामुक्त कुटुंबाची आरती करून स्वागत; रत्नागिरीतील शिरगाव गावचा आदर्शवत उपक्रम
कोरोनामुक्त कुटुंबाची आरती करून स्वागत; रत्नागिरीतील शिरगाव गावचा आदर्शवत उपक्रम

रत्नागिरी -कोरोनाबाधित व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही अनेकांचा वेगळा आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने या सर्वांना छेद देत माणुसकीचा वेगळा पैलू समाजापुढे ठेवला आहे. कोरोनावर मात करणार्‍या योद्ध्यांची आरती करून गावात स्वागत केले. एवढेच नव्हे तर त्या योद्ध्यांची ओवाळणीही केली. गेल्या चार महिन्यांमध्ये देशात हे चित्र तसे दुरापास्तच आहे. मात्र शिरगाव ग्रामपंचायतीने हा नवा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. बाधितांना आधार आणि सर्वांच्या पाठबळाची गरज आहे. मात्र, फार क्वचित हे चित्र दिसत आहे.

कोरोनाबाधित सोडा कटेंनमेंट झोनमधून येणार्‍यांना गाव, वाडी आणि सोसायटीमध्ये प्रवेश मिळत नाही. कोरोनावर मात केलेला रुग्ण असला तरी त्याला प्रवेश देताना विचार केला जातो. कोरोनाबाधितांबाबतची भीती, संशय लोकांच्या मनातून गेलेला नाही. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने कोरोनावर मात करणार्‍या या योद्ध्यांचा आपुलकीने सन्मान करून गावात स्वागत केल्याचे वेगळे आणि आदर्शवत उदाहरण पुढे आले आहे.

शिरगाव-तिवंडेवाडीतील एका कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये काही चिमुकल्यांचाही समावेश होता. मात्र, हे चिमुकलेही कोणतीही भीती न बाळगता धीटपणे या परिस्थितीला सामोरे गेले. गावकर्‍यांनी हा प्रसंग पाहिला होता. जर एवढी लहान मुले कोरोनाला धाडसाने तोंड देत असतील तर आम्ही का मागे पडायचे. म्हणून शिरगाव ग्रामपंचायतीने आणि ग्राम कृती दलांनी या कोरोना योद्ध्यांचे आरती ओवाळून स्वागत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नुकतेच हे कोरोना योद्धे सन्मानाने गावात परत आले. शिरगाव गावचा हा आदर्श अनेकांनी घ्यावा असाच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details