रत्नागिरी -गेले काही दिवस रिफायनरीवरून ( Nanar Refinery ) वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यातच शिवसेनेकडूनही या ( Shivsena Reaction On Nanar Refinery ) प्रकल्पाबाबत सकारात्मक वक्तव्ये येत आहेत. त्यामुळे रिफायनरी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी आज भव्य मोर्चा काढून रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. शहरातील कोदवली नदीपात्रातील खर्लीपात्र ते तहसिलदार कार्यालय ( Agitation Against Nanar Refinery In Ratnagiri ) असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’,‘ एकच जिद्द, रिफायनरी रद्द, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रिफायनरी विरोधात शासनाला निवेदन -बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बारसू-सोलगाव-धोपेश्वर पंचक्रोशीमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये अशी मागणी केली. तसा प्रकल्प प्रस्तावित केल्यास त्याला ठाम विरोध राहील अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. हे निवेदन तहसिलदार शितल जाधव यांच्याकडे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, नेते अशोक वालम, सत्यजित चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सुपूर्द केले.