रत्नागिरी - कोकणातील दोडामार्ग येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पती प्रकल्पासाठी मंजुरी देऊनसुद्धा अद्यापपर्यंत राज्य शासनाने जागा दिलेली नाही. या प्रकल्पासाठी त्वरित जागा देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात, रत्नागिरीतील ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी अॅडव्होकेट राकेश भाटकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
प्रकल्पाबाबत सद्यस्थिती
भारत सरकारचा औषधी वनस्पती लागवडीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी मंजूर केला असून सातत्याने दोन वर्ष पाठपुरावा करूनसुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. राज्य सरकारने हा प्रकल्प जळगाव येथे करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र आयुष मंत्रालयाला दिले होते, परंतु आयुष संचालकांनी राज्य शासनाची ही मागणी फेटाळली आहे. त्यानंतर आता पुन्हा हा प्रकल्प लातूरला नेण्याचा प्रयत्न चालू आहे. जागतिक संघटनेने औषधी वनस्पतींसाठी पश्चिम घाट हा उपयुक्त मानलेला असून त्या अनुषंगाने आयुष मंत्रालयाने तिथे प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. २०१८साली सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून प्रस्तावित जागा निश्चित केली आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनास पाठवला आहे. ही जनहित याचिका दिनांक 4 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सय्यद व जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस असता महाराष्ट्र सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. प्रतिज्ञापत्रामध्ये, जागा निश्चित करण्यात आली असून त्या जागेची मालकी ही एमआयडीसीकडे असल्याने त्या विभागाच्या प्रमुखांकडे पत्रव्यवहार चालू असल्याचे म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
या याचिकेवर ती पुढील सुनावणी मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्या खंडपीठापुढे पाठवण्यात आली असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. कोकणामध्ये लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.