रत्नागिरी -गेल्या दोन दिवसात एकही बस चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात दाखल झालेली नाही. 12 ऑगस्टनंतर जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करून घेतल्यानंतरच प्रवास करणे बंधनकारक असल्याने, ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात एकही एसटी बस आली नाही गणेशोत्सवासाठी कोकणी माणूस आपल्या गावी हमखास येतोच. मात्र, यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सरकारकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी योग्य ती खबरदारी घेत एसटी बसेस मुंबईतून सोडण्यात आल्या आहेत. 12 ऑगस्टपर्यंत 297 एसटी बसेस 5 हजार चाकरमान्यांना घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी येणाऱ्या सर्वांनाच दहा दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी आहे. त्यामुळे जे 12 ऑगस्टपर्यंत येतील त्यांचा 10 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी गणेश चतुर्थीपर्यंत पूर्ण होत आहे. मात्र, 12 ऑगस्टनंतर येणाऱ्यांना कोरोना टेस्ट करून येणे बंधनकारक आहे. ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे, त्यांनाच एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे. मात्र, जर एकाच घरातील चार जण येणार असतील तर टेस्टचा खर्चही आलाच, शिवाय रिपोर्ट मिळायला वेळ जातोच, त्यामुळेच प्रवाशांनी 12 ऑगस्टनंतर एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसात एकही एसटी बस मुंबई किंवा इतर भागातून चाकरमान्यांना घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेली नाही. रत्नागिरी एसटी विभागाकडून ही माहिती देण्यात आली. एकूणच 12 ऑगस्टनंतर येणाऱ्यांसाठी कोरोना टेस्ट बंधनकारक असल्याने ही स्थिती असल्याचे म्हटले जात आहे.