रत्नागिरी -नाणार रिफायनरी प्रकल्प वाढत्या समर्थनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिफायनरी समर्थकांनी स्थानिक आमदार राजन साळवी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. प्रस्तावित प्रकल्प लवकर मार्गी लावावा. या प्रकल्पाबाबतच्या आमच्या भावना शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव शिवसेना ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती साळवी यांना केली. या सर्थकांमध्ये परिसरातील स्थानिक शेतकरी व शिवसैनिकांचा समावेश होता. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या साडेसहा हजार एकर जमिनीची संमतीपत्रेही आमदार साळवी यांच्याकडे सुपूर्द केली.
नाणार रिफायनरी समर्थकांनी घेतली राजन साळवींची भेट; मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याची केली मागणी - नाणार रिफायनरी लेटेस्ट न्यूज
'सामना' ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिले. त्यामुळे रिफायनरी समर्थकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. समर्थकांच्या एका गटाने स्थानिक आमदार राजन साळवी यांची भेट घेतली.
'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक संकेत दिले होते. 'नाणारचासुध्दा सरकारने करार केला होता, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो, आता सरकार म्हणून सगळ्यांना मान्य असेल तर करार करू', असे सकारात्मक संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत दिले होते. त्यामुळे रिफायनरी समर्थकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती आणि हजारोंवर आलेली बेरोजगारीची वेळ, यामुळे हा प्रकल्प झाला पाहिजे, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.
यापूर्वीच्या प्रस्तावित जमिनीतील घरे, मंदिरे वगळून अन्य जागा अधिग्रहीत करून या प्रकल्पाची अधिसूचना काढावी. या प्रकल्पाला 'छत्रपती शिवाजी महाराज रिफायनरी' असे नाव द्यावे. स्थानिक शेतकरी व शिवसैनिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी, अशी मागणी नाणार समर्थकांनी केली.