महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाणार' प्रकल्प समर्थकांचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

राजापूर तालुक्यातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प सरकारकडून रद्द करण्यात आला होता. मात्र, हा रिफायनरी प्रकल्प सूरू व्हावा, या मागणीसाठी प्रकल्प समर्थकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी मोर्चातून जनतेची वास्तविक भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल, मुख्यमंत्र्यांकडे आमचे म्हणणे मांडण्याची आम्हाला संधी मिळावी, अशी मागणी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळाने केली आहे.

By

Published : Jul 20, 2019, 6:10 PM IST

Updated : Jul 20, 2019, 7:59 PM IST

'नाणार' प्रकल्प समर्थकांचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच व्हावा या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांकडून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोकण विकास समितीकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजापूर, लांजा, रत्नागिरी या भागातील ग्रामस्थ, व्यापारी, तरुण असे हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते.

'नाणार' प्रकल्प समर्थकांचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

मोर्चात प्रकल्प समर्थनासाठी घोषणाबाजी

शहरातील मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोर्चेकरांनी चला असत्याकडून सत्याकडे, आता नाही तर कधीच नाही, येईल जेव्हा रिफायनरी संपून जाईल बेरोजगारी, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, असे फलक हाती घेऊन घोषणा दिल्या.

तरूणांचा लाक्षणिक सहभाग

आजच्या मोर्चात तरुणांचा उत्फूर्त सहभाग हा लाक्षणिक ठरला. त्याचप्रमाणे शेतकरी, महिला, उद्योजक, व्यापारी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय अनेक संस्थांनीही या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे.

नाणार येथील शेतकऱ्यांचा सहभाग आश्चर्यकारक

या मोर्चाचे वैशिष्ठ्ये ठरले ते म्हणजे हा प्रकल्प ज्या भागात होणार आहे त्या नाणार परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ यांचा मोर्चातील सहभाग. याच प्रमाणे राजापूरमधील स्थानिकही या मोर्चात आपल्या जमिनीचा सात-बारा हाती घेवून सहभागी झाले होते.

'नाणार' प्रकल्प समर्थकांचा मोर्चा

प्रकल्प समर्थकांच्या शिष्टमंडळाने उप-जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

समर्थकांचा हा मोर्चा माळनाका सामान्य रुग्णालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चावर माळनाका येथे पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी हजारो मोर्चेकरी एकत्र आलेले दिसून आले. त्यानंतर प्रकल्प समर्थकांच्यावतीने शिष्टमंडळाने उप-जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

मोर्चातून जनतेची वास्तविक भावना मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचेल

या प्रकल्पामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार असून स्थानिक शेतकरी देखील या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्यामुळे नाणार येथे हा प्रकल्प व्हावा, अशी जनतेची भावना आहे. मोर्चातून जनतेची वास्तविक भावना मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचेल व मुख्यमंत्र्यांकडे आमचे म्हणणे मांडण्याची संधी आम्हाला मिळावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

काय आहे नाणार प्रकल्प ?

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्याकडून हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाच्या अरमाको कंपनीने सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार आहे. भारताच्या पश्चिम किनारी असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील तसेच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असे सांगण्यात येत आहे. परंतू शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे नाणार प्रकल्पाला रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Last Updated : Jul 20, 2019, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details