महाराष्ट्र

maharashtra

जिल्ह्यात पावसाची संततधार; बळीराजा सुखावला

जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मध्यरात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाने बरसात केली आहे.

By

Published : Jun 27, 2019, 7:09 PM IST

Published : Jun 27, 2019, 7:09 PM IST

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे दृष्य

रत्नागिरी- जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मध्यरात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाने बरसात केली. बुधवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला होता. आज पुन्हा पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दमदार सलामी दिल्याने खऱ्या अर्थाने जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे दृष्य


जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू होता. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याही उशिरा केल्या. मध्यंतरी पावसाने चांगली हजेरी लावली होती. पण त्यानंतर मात्र पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली. अधूनमधून किरकोळ सरी बरसत होत्या. मात्र, शेतीच्या कामांना जसा पाऊस आवश्यक होता, तसा पाऊस झाला नाही. पण, बुधवारी दुपारपासून बरसलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे आतातरी पावसाने आपला लपंडाव थांबवून अशीच पर्जन्यवृष्टी करावी असे साकडे बळीराजाने वरुणराजाला घातले आहे.


दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण ४३५ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरी ४८.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात २४ तासात सर्वाधिक १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात राजापूरमध्ये ८४, तर चिपळूणमध्ये ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, गुहागर आणि खेडमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात गुहागरमध्ये ७ मिमी तर खेडमध्ये १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


जनतेला सावधानतेचा इशारा


दरम्यान रत्नागिरी जिल्हयात २९ जून २०१९ पर्यंत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details