महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2020, 9:31 PM IST

ETV Bharat / state

मंदिर वेढलं पाण्याने, तरी सप्ताहात नाही खंड; छातीपर्यंत पाण्यात उभ्याने हरिनाम गजर

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. मात्र, या पाण्यातही भाविकांनी नाम सप्ताहात खंड पडू दिलेला नाही. मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले असून, छातीपर्यंत आलेल्या पाण्यात उभे राहून भाविकांनी आपला नामगजर सुरू ठेवला होता.

मंदिर वेढलं पाण्याने, तरी सप्ताहात नाही खंड
मंदिर वेढलं पाण्याने, तरी सप्ताहात नाही खंड

रत्नागिरी -जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे.

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने जिल्ह्यातील बहुतांश मंदिरांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. मात्र, या पाण्यातही भाविकांनी नाम सप्ताहात खंड पडू दिलेला नाही. रत्नागिरी तालुक्यातील तोणदे-भंडारवाडीतील सांब मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले असून, छातीपर्यंत आलेल्या पाण्यात उभे राहून भाविकांनी आपला नामगजर सुरू ठेवला होता.

कोकणात गणेशोत्सवापूर्वी अनेक गावांमध्ये श्रावण महिन्यातील हरिनाम सप्ताह सोहळा होतो. यंदा कोरोनाचे संकट तर आहेच. पण सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने काही मंदिरांमध्येही पाणी शिरल्याचे चित्र आहे.

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने त्याचे पाणी तोणदे भागात शिरले आहे. या भागातील भंडारवाडी येथे असणाऱ्या सांब मंदिराला बुधवारी पुराच्या पाण्याचा वेढा पडला. या पुराच्या पाण्यातही येथील भाविकांनी नामसप्ताह सुरूच ठेवला होता. नागरिकांनी हरिनाम सप्ताहामध्ये खंड पडू दिला नाही. अगदी छातीभर पाण्यातही गावची ही मंडळी देवाचा गजर करताना दिसत आहेत. न चुकता हा सप्ताह सोहळा सुरू आहे. या मंदिराला पाण्याचा वेढा पडला असून मंदिरात पाणी शिरले आहे. पण, गावकरी मात्र भक्तीत आणि देवाच्या नामस्मरणात दंग आहेत. यावेळी देवळापर्यंत पोहोचण्यासाठी गावकरी होडीची मदत घेत आहेत. सध्या या सप्ताहाची जोरदार चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details