महाराष्ट्र

maharashtra

देवरुखजवळच्या हातीवमध्ये बिबट्याचा भूकबळी; गोठ्यात मृत्यू

By

Published : Dec 21, 2020, 9:37 AM IST

मानव आणि वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते आहे. यात प्रामुख्याने बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष जास्त आहे. देवरुखमध्ये हातीव गावात उपासमारीमुळे एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Leopard
बिबट्या

रत्नागिरी - देवरुख शहराजवळील हातीव येथे उस्मान साटविलकर यांच्या गोठ्यात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपाशी असलेला बिबट्या भक्ष्याच्या शोधात आला असता त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

भुकेमुळे बिबट्याचा मृत्यू -

हातीव गावातील उस्मान साटविलकर यांच्या गोठ्यात रविवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. ही घटना उघड झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर सुरू होता. बिबट्या भक्ष्याच्या शोधात गावाच्या सीमेवरून फिरत होता. रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात तो गोठ्यात आला परंतु अनेक दिवस उपाशी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. वनविभागाने बिबट्याचे शवविच्छेदन करून त्यावर अंत्यसंस्कार केले.

बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला -

गेल्या काही वर्षांत बिबट्यांंचा मानवी वस्तीतील वावर वाढला आहे. भक्ष्याच्या शोधात हे बिबटे अगदी गावापर्यंत येतात. त्यामुळे अनेकवेळा बिबटे विहिरीत पडल्याच्या घटनाही घडतात. माणसांवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

गेल्याच आठवड्यात सोलापुरात नरभक्षक बिबट्याला केले ठार -

अहमदनगर, बीड आणि सोलापूरमध्ये अनेकांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी ठार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात अवनी नावाच्या वाघीनीने 13 जणांचा बळी घेतल्यानंतर अशाप्रकारचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा शासनाने तसे आदेश दिले. आष्टी तालुक्यातील सुरुडी, किन्ही, मंगरुळ, पारगाव येथील शेतकऱ्यांवर हल्ला करून बिबट्याने तिघा जणांचा बळी घेतला तर, तिघांना गंभीर जखमी केले. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली होती. अथक प्रयत्नानंतर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले.

ABOUT THE AUTHOR

...view details