महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर श्रीवर्धन मतदारसंघात काँग्रेस करणार बंड

श्रीवर्धन मतदारसंघ हा सुनिल तटकरे यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघाने तारल्याने ते विजयी झाले. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये विधानसभेला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार, असे चित्र निर्माण झाले. मात्र, काँग्रेसला यावेळी हा मतदार संघ आपल्या ताब्यात हवा आहे.

By

Published : Aug 19, 2019, 9:27 PM IST

तर श्रीवर्धन मतदार संघात काँग्रेस करणार बंड

रायगड- येथील श्रीवर्धन मतदारसंघ हा सुनिल तटकरे यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघाने तारल्याने ते विजयी झाले. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये विधानसभेला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार, असे चित्र निर्माण झाले असतानाच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा, असे बंडाचे शस्त्र उचलल्याने सुनिल तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा मेळावा म्हसळा येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला श्रीवर्धन मतदारसंघातील जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोंडसुख घेतले. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार दहा वर्षे असूनही जनतेची विकासकामे झालेली नाहीत. काँग्रेस पक्षाला नेहमी खच्चीकरण करण्याचे काम सुनिल तटकरे यांनी केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला राखीव ठेवावा अन्यथा बंडाचा पवित्रा उचलला जाऊन अपक्ष उमेदवार देऊ, असे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

काँग्रेसच्या वरिष्ठांनी वरच्या पातळीवर कोणतीही तडजोड करुन श्रीवर्धन मतदारसंघ पुन्हा मित्रपक्ष राष्ट्रवादीला दिल्यास आम्ही काम करणार नसून, आमचा स्वतंत्र अपक्ष उमेदवार देण्याची घोषणा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. मोईज शेख यांनी केली. यावेळी रोहा तालुक्याचे अध्यक्ष निजाम सय्यद, तळा तालुक्याचे अध्यक्ष खेळू वाजे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये तटकरे यांच्या परिवारवादी राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली.

काँग्रेस पक्षाचा हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करण्यासाठीच असल्याचे पदाधिकारी यांच्या भाषणातून स्पष्ट होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला श्रीवर्धन मतदार संघ सोडल्यास काँग्रेस येथून बंडखोरी करणार हे नक्की. त्यामुळे सुनिल तटकरेच्या व पक्षाच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details