रायगड - महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा ९२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारोंच्या संख्येने भीम अनुयायीचा भीमसागर चवदार तळ्यावर लोटला होता.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श करुन अखिल मानव जातीला पाण्याचा हक्क खुला केला. या ऐतिहासिक घटनेला आज ९२ वर्ष पूर्ण होत आहेत. चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने सारा परिसर हा निलमय झाला आहे. चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी गर्दी केली होती. चवदार तळे ते क्रांतीस्तंभ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र, पुतळे आणि बिल्ल्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत.