पनवेल - शहरात जागोजागी साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे सिडको नेहमीच चर्चेत असते. आता शहरातील कामोठे भागात मोकळ्या जागेवर वाढलेले गवत आणि झाडेझुडपे काढण्यास पुरेसा वेळ नाही, अशी उडवाउडवाडी उत्तरे देताना सिडको दिसत आहे. सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मोकळ्या जागांवर गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि झाडेझुडपांवर डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे कामोठेतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीच्या राजपथावरुन स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. देवालयाच्या आधी शौचालये बांधा, असे त्यांनी सांगितले. अभियान चार वर्षाचा टप्पा पार करत असतांना पंतप्रधानांनी या अभियानाच्या या जबाबदारीतुन लालफितीचा कारभार सांभाळणाऱ्या सरकारी साहेबांना वगळल्याचे दिसत आहे. कामोठे मधील सेक्टर 36 इथे सिडकोचे भूखंड क्रमांक 52, 38ए, 32, 39 या जागेवर भूखंड हे वापरात नसल्यामुळे ओस पडून आहेत. सिडकोचे हे भूखंड आता अस्वच्छतेचे आगार बनत चालले आहेत. या मोकळ्या प्लॉटवर झाडे झुडुपे गवत वाढलेले असते. मोकाट जनावरांचा तिथे सारखा वावर असतो. या मोकळ्या प्लॉटमध्ये गटारीचे पाणी, पावसाचे पाणी साचून राहते. त्यातून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव होत असतो. मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना या अस्वच्छतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही.