रायगड - कोरोनामुळे सध्या सर्व जग थांबले असले तरी शेती व्यवसाय आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. आज देशात सध्या आरोग्य यंत्रणा, शासकीय यंत्रणा याचबरोबर शेतकरी राजा हा आपल्या जमिनीत मेहनत घेऊन या संकटकाळात धान्य, भाजीपाला पिकवत आहे. जिल्ह्यातही शेतकरी पुन्हा जोमाने शेती करण्यास सज्ज झाला असून शासनाकडून शेतीला लागणारे खत, बियाणे याची तरतूद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी 17 हजार क्विंटल खत शेतीसाठी वापरले जाते. यावर्षी 4 हजार 500 क्विंटल खत जादा असे 21 हजार 500 क्विंटल खत मागविले आहे, तर आतापर्यत 9 हजार क्विंटल खत हे कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहे. कोरोनामुळे काम बंद असल्याने चाकरमानी हे गावी आले असल्याने काही प्रमाणात त्यांचा शेतीकडे कल वाढणार असल्याने आधीच खताचा जादा पुरवठा मागविण्यात आले असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातून लाखो नागरिक हे मुंबई, ठाणे शहरात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. मुंबईत वाढत्या कोरोना बाधितांमुळे लाखो चाकरमानी हे पायी चालत आपल्या गावी दाखल झाले आहेत. तर आता शेतीची कामेही सुरू झाले असल्याने शेतात मशागत, राब भाजणे ही कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे आलेले चाकरमानी हे सुद्धा आता पुन्हा शेती व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. कोरोना सारखी महामारी आली असल्याने अनेक चाकरमानी हे आता पुन्हा शहरात जाण्यासाठी धजावणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात शेती लावण्याकडे कल वाढला जाणार असून पुन्हा एकदा रायगड हा भाताचे कोठार म्हणून आपली ओळख निर्माण करू शकणार आहे.