महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : एकेकाळी वर्चस्व असलेले काँग्रेस, शेकाप आज दुसऱ्याला देत आहेत टेकू

एकेकाळी काँग्रेस व शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात शेकाप व काँग्रेस पक्षाची वाताहत होताना दिसत आहे.  हे पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत.

By

Published : Apr 2, 2019, 4:07 PM IST

एकेकाळी वर्चस्व असलेले काँग्रेस, शेकाप आज दुसऱ्याला देत आहेत टेकू

रायगड - रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा. या मतरदारसंघात १९९५२ ते २००४ पर्यंत काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे आलटून पालटून प्राबल्य राहिले होते. २००९ नंतर आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मात्र, एकेकाळी काँग्रेस व शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात शेकाप व काँग्रेस पक्षाची वाताहत होताना दिसत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की या दोन पक्षावर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस व शेकाप हे लोकसभा निवडणुकिवर पाणी सोडणार अशी वेळ दोन्ही पक्षावर आलेली आहे.

एकेकाळी वर्चस्व असलेले काँग्रेस, शेकाप आज दुसऱ्याला देत आहेत टेकू

चिंतामण देशमुख कुलाब्याचे पहिले खासदार

१९५२ कुलाबा लोकसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चिंतामण देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शेकापचे उमेदवार राजाराम राऊत यांचा पराभव केला होता. कुलाबा जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून चिंतामण देशमुख यांना मान मिळाला आहे. त्यानंतर १९५७ ला शेकापचे राजाराम राऊत, १९६२ भास्कर दिघे (काँग्रेस),१९६७ दत्तात्रेय कुंटे (शेकाप), १९९७१ शंकर सावंत (काँग्रेस), १९७७ दिनकर पाटील (शेकाप), १९८० अंबाजी पाटील (काँग्रेस आय), १९८४ दिनकर पाटील (शेकाप), १९८९, १९९१, १९९६ बॅ. ए. आर. अंतुले (काँग्रेस आय), १९९८, १९९९ रामशेठ ठाकूर (शेकाप) हे काँग्रेस, शेकापचे ३ उमेदवार कुलाबा लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.

२००४ ला कुलाबाचे नाव बदलून जिल्ह्याला रायगड नाव देण्यात आले. रायगड लोकसभेतून २००४ ला पुन्हा काँग्रेसचे बॅ. एआर अंतुले निवडून आले. २००९ व २०१४ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणला. तर २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभव केला होता.

शेकापने ६ तर काँग्रेसने ८ वेळा जिंकली लोकसभा

कुलाबा जिल्ह्याच्या निर्मितीपासून या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस व शेकाप यांचेच वर्चस्व आलटून पालटून राहिले होते. शेकापने ६ तर काँग्रेसने ८ वेळा या मतदारसंघात लोकसभा जिंकली होती. तर शिवसेनेने १९९१ पासून आपले उमेदवार या मतदारसंघात उभे केले होते. शिवसेनेने १९९१ मध्ये सतीश प्रधान, १९९६, १९९८ अनंत तरे, १९९९ दी. बा. पाटील, २००४ शाम सावंत हे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे केले होते. मात्र, त्यांना यश प्राप्त झाले नाही. तर भाजपनेही एकदा १९८९ मध्ये नरेंद्र जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनाही यश मिळाले नव्हते.

अनंत गीते यांनी रायगडावर फडकवला भगवा

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. एआर अंतुले यांच्यासमोर शिवसेनेचे रायगडाला नवखे असलेले अनंत गीते यांना उभे करण्यात आले. गीते यांनी अंतुले यांचा यावेळी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेला हे यश मिळविण्यासाठी १८ वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा पराभव करून पुन्हा शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगडावर भगवा फडकवला.

काँग्रेस, शेकापला चिंतनाची गरज

काँग्रेस, शेकाप या बलाढ्य पक्षाचे एकेकाळी कुलाबा व नंतरच्या रायगड लोकसभा मतदार संघात वर्चस्व असताना शिवसेना पक्षाने २००९ नंतर आपले वर्चस्व या मतदार संघावर कायम ठेवले आहे. तर काँग्रेस व शेकाप यांचे जिल्ह्यात कमी झालेले वर्चस्व हा आगामी काळात दोन्ही पक्षांना चिंतन करणारा विषय ठरणार आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होत आहे. तर एकेकाळी स्वतःचा प्रतिस्पर्धी उमेदवार देणारे काँग्रेस, शेकाप हे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. ही खरी शेकाप व काँग्रेस पक्षासाठी चिंतेची बाब आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details