पुणे - राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही प्रकारचे दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. दोन ते तीन तासच फक्त दुकाने, भाजी मंडई सुरू असल्याने ग्राहकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पुण्यातील महात्मा फुले मंडईत असलेल्या सिझनल फळाला ग्राहकच मिळत नसल्याने तब्बल साडेचार टनहुन अधिक कलिंगड खराब झाले. यामुळे विक्रेत्यावर ते कलिंगड फेकून देण्याची वेळ आली.
कडक निर्बंधांचा बसला मोठा फटका -
राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहे. दिवसभरात फक्त 2 ते 4 तासच दुकाने सुरू असल्याने फळ विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणत आर्थिक फटका बसला आहे. जवळजवळ 90 टक्के ग्राहक कमी झाले असून याचा फटका आम्हाला बसत आहे. यामुळे असलेला माल खराब होत असून दररोज मोठ्या प्रमाणात कलिंगड खराब होत आहे. ते फेकून द्यावे लागते आहे. याचा मोठा फटका आम्हा व्यापाऱ्यांना बसत आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी राहुल कासोरडे यांनी यावेळी दिली.