पुणे -महाराष्ट्रातल्या अनेक भागात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, सोमवारी निकाल जाहीर झाले, या निकालांमधून काही गमतीशीर तर काही हृदयस्पर्शी घटना समोर आल्या आहेत. यातीलच एक घटना म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या आपल्या नातवाला 113 वर्ष वयाच्या आजींनी मतदान केले. मात्र ज्या दिवशी मतदान झाले, त्याच दिवशी या आजीचा मृत्यू झाला. आजीच्या निधनानंतर सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये हा नातू अवघ्या एका मताने विजयी झाला. या उमेदवाराला आजीच्या एका मतामुळे विजय मिळाला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
मतदान केल्यानंतर आजीचा मृत्यू, आजीच्या एका मताने नातवाचा विजय - Pune District Latest News
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या आपल्या नातवाला 113 वर्ष वयाच्या आजींनी मतदान केले. मात्र ज्या दिवशी मतदान झाले, त्याच दिवशी या आजीचा मृत्यू झाला. आजीच्या निधनानंतर सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये हा नातू अवघ्या एका मताने विजयी झाला. या उमेदवाराला आजीच्या एका मतामुळे विजय मिळाला असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
![मतदान केल्यानंतर आजीचा मृत्यू, आजीच्या एका मताने नातवाचा विजय आजीच्या एका मताने नातवाचा विजय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10312206-thumbnail-3x2-grampanchyat.jpg)
अवघ्या एका मताने झाला विजय
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वाळेण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विजय साठे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीदरम्यान त्यांनी जोरदार प्रचार केला. त्यांनी आपल्या 113 वर्षांच्या आजी सरुबाई शंकर साठे यांना देखील मतदान करायला लावले. या आजींची तब्येत बरी नव्हती, त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या, त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. मात्र नातवासाठी या आजींंनी मतदानाचा हक्क बजावला. ज्या दिवशी मतदान झाले त्याच दिवशी आजींचा मृत्यू झाला. सोमवारी निवडणुकींचे निकाल लागले आणि या निवडणुकीमध्ये विजय साठे यांचा अवघ्या एक मताने विजय झाला. त्याक्षणी त्यांच्या एका डोळ्यात आनंदाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आपला विजय पाहायला आज आजी हयात नसल्याचे दुःख होते. विजय साठे यांच्या विजयात सरुबाई यांचे योगदान हे आशीर्वाद ठरले. मात्र या प्रसंगाने साठे कुटुंबाला आनंद आणि दुःख यांची एकत्र जाणीव करून दिली. परिसरामध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.